औद्योगिक भागातून येणारा आणि पठारवाडी भागातून जाणारा जलस्रोत प्रदूषित
चाकण – नैसर्गिक ओढे, नदी आणि नाले हे पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत आहेत. मात्र, ते स्वच्छ ठेवण्याची मनोवृत्ती नसल्यामुळे त्यांची गटारे बनल्याचे चित्र चाकण व परिसरात हमखास पाहावयास मिळते.
एकेकाळी पावसाचे पाणी वाहून नदीकडे नेणाऱ्या या जलस्रोताला पूर येत होता. हे चित्र आता झपाट्याने बदलत असून गृहप्रकल्पांचे सांडपाणी आणि मैला वाहत असलेले सांडपाणी येथून वाहत आहे. हे सर्व सांडपाणी आणि घाण सरते-शेवटी गावाला वाड्या वस्त्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या नदीतच जाते. आणि प्रदूषित झालेले हे पाणी पुन्हा गावालाच प्यावे लागत असून रोगराईचा सामना करावा लागतो, अशी स्थिती चाकण परिसरात निर्माण झाली आहे. त्यामुळे ओढ्यांच्या आणि पर्यायाने नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न या भागात गंभीर होत आहे. चाकणच्या औद्योगिक भागातून येणारा आणि चाकणमधून पुढे पठारवाडी भागातून जाणारा ओढा आता भयंकर प्रदूषित झाला असून गावातील आणि आसपासच्या परिसरातील सांडपाण्याचीही भर त्यात पडत असून भयंकर दुर्गंधीने ओढ्या लगतच्या भागातील नागरिकांना दुर्गंधीमुळे नाक मुरडत वास्तव्य करावे लागत आहे.
छोट्या-मोठ्या ओढ्यांच्या माध्यमातून थेट नदीत जाणाऱ्या सांडपाण्याने नागझिरा होण्यापासून नद्यां वाचविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाल्याची नागरिकांची भावना आहे, या भागातील बहुतांश नद्यांमध्ये “वाढता वाढता वाढे’ या उक्ती प्रमाणे वाढणाऱ्या जलपर्णीच्या संकटाने नद्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून घुसखोरी केल्याने नद्यांचा श्वास गुदमरला आहे. या भागातील नद्यांना प्रदूषण समस्येचा विळखा पडला आहे. नदीच्या पात्रांमध्ये होणारे भयंकर प्रदूषण आणि दूषित पाण्याचा परिणाम म्हणून पात्र व्यापून टाकणारी जलपर्णी हा विषय गेल्या काही वर्षात गंभीर झाला आहे. जलपर्णीच्या या संकटाने गेल्या काही वर्षात जवळपास खेड तालुक्यातील इंद्रायणी ,भीमा,भामा आदी बहुतांश नद्यांमध्ये घुसखोरी केली आहे. विशेषत: हिवाळा संपता संपता ही जलपर्णी नद्यांचा ताबा घेत असून मग पावसाळ्यापर्यंत तिचेच राज्य नद्यांवर पहावयास मिळत आहे. नदीमध्ये प्रदूषण पचवण्याची क्षमता नाही. जे प्रदूषण नदीत फेकले जाईल भविष्यात ते आपल्यावरच पलटवार करणार आहे, त्यामुळे ओढ्यांचे प्रदूषण आणि नद्यांमध्ये फोफावणाऱ्या जलपर्णीच्या समस्ये बाबत स्थानिक स्वराज्य संस्थांसह, राज्य शासनाच्या पाटबंधारे खात्याने, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने, निरनिराळ्या विषयांतील शास्त्रज्ञांची,विज्ञान संस्थांची मदत घेऊन नवनवे तंत्रज्ञान राबवून हा प्रश्न प्राधान्याने सोडविला पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.
भूजल प्रदूषणाचा विळखा
चाकण भागात साधारणत: 15 ते 20 वर्षांपूर्वी कोणत्याही विहिरीचे पाणी बिनधास्त पिता येत होते, तेच हातपंपाच्या पाण्याबाबतही होते. उघड्या वाहणाऱ्या पाण्याबाबत काही शंका असायच्या, पण भूजलाबाबत शंका घ्यायचे कारण नव्हते. त्याच्या दर्जासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ किंवा इतर कोणत्याही संस्थेच्या अहवालाची गरजही नव्हती. आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. विहिरींना व हातपंपाना दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असून भूजल प्रदूषणाच्या समस्याही या भागात येत्या काही वर्षात हातपाय पसरण्याची शक्यता नाकरता येत नाही.
“सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प’ कागदोपत्रीच!
विकसित देशांच्या धर्तीवर सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी पुन्हा वापरात येऊ शकते, हा प्रयोग राज्यातील सुमारे 100 गावांमध्ये यशस्वी करण्याचा शासनाचा प्रयत्न होता. पर्यावरणाला पूरक व दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी आदर्शवत असा हा प्रयोग पुणे जिल्ह्यातील चाकणसह नऊ गावांमध्ये राज्य शासनाचा हा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रयत्नशील होते. तत्कालीन चाकण ग्रामपंचायतीने ग्रामसभेत ठराव करून यात सहभागी होण्यासाठी पुढाकारही घेतला होता, पण या प्रकल्पाचे घोडे कुठे आडले ते मात्र समजले नाही. आणि सध्या असलेल्या नगरपरिषदने याबाबत काही पत्रव्यवहार केला नसल्याचे समजते.