नवी दिल्ली: जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थांची मंदावलेली स्थिती आणि वाढत्या अनुत्पादक मालमत्तांमुळे बॅंकांवर ताण आहे. या पार्श्वभूमीवर बॅंकांना साहाय्य करण्यासाठी अर्थ मंत्रालयाने काही पावले उचलली असून त्याला पूरक निर्णय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने घेतला आहे. अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत दिली.
बॅंकांना अधिक साहाय्य देण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ईसीजीसीच्या माध्यमातून कार्यकारी भांडवल कर्जासाठी बॅंकांचे विमा कवच 90 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. यामुळे निर्यातदारांसाठी विदेशी मुद्रा आणि निर्यात ऋण (रुपयांमध्ये) व्याज दर अनुक्रमे 4 आणि आठ टक्क्यांपेक्षा खाली राहतील. सरकारच्या प्रोत्साहन पॅकेजमुळे बॅंकांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी निर्यात कर्ज देणे सुलभ होईल, असे गोयल यांनी सांगितले.