मुंबई: राज्यातील बॅंकांमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि नियमित सॅनिटायजेशनसारख्या उपाय योजना केल्या जात नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा होण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
या स्थितीत बॅंक कर्मचाऱ्यांना धोका निर्माण झाल्याबद्दल बॅंक संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. राज्यातील बॅंकांनी करोनाशी संबंधित उपाय योजनांची कठोरपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बॅंका आणि स्थानिक अधिकाऱ्यांना देण्याची मागणी या बॅंक कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्र्यांना केली आहे.
केंद्र सरकारकडून तसेच राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना लागू केलेल्या असतानाही बॅंक शाखांकडून नियमितपणे सॅनिटायजेशनचे पालन करीत नाहीत.
गर्दी नियंत्रित करण्यासाठी बॅंका प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक तैनात करत नाहीत. एकट्या मुंबईत 15 बॅंक कर्मचाऱ्यांच मृत्यू झाला असून शेकडो कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झली आहे, असे मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.