मुंबई – ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन बराच कालावधी लोटलेला असताना या चित्रपटाबाबत पुन्हा वाद सुरु झाल्याचे दिसून आले होते. गोव्यात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ज्युरीने केलेल्या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर सिने सृष्टीसह राजकीय वर्तुळातून देखील अनेकांनी भाष्य केलं होत. आता प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी देखील याबाबत भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तेव्हाच्या निर्णयाबाबतची आठवण देखील करून दिली.
एका मराठी वृत्त वाहिनीवरील कार्यक्रमात अनुपम खेर बोलत होते. ते म्हणाले,”अत्याचार झालेल्या काश्मिरी पंडितांचे स्वागत करणारे बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी होते.” तसेच आम्ही बाळासाहेबांचे आभारी आहोत त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना काश्मिरी पंडितांविषयी माहिती आहे. असं स्पष्ट मत अनुपम खेर यांनी व्यक्त केलं.
तसेच खेर पुढे म्हणाले,”महाराष्ट्राच्या महाविद्यालयांमध्ये काश्मीरचे विद्याथी येऊन आपलं दुःख सांगत होते यासाठी ते महाराष्ट्रातील छोट्या छोट्या गावांपर्यंत गेले होते. अशात बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी होते जे म्हटले होते या सर्वांचं स्वागत आहे. या विद्याथ्यांना विद्यापीठांमध्ये घ्या,यांना राहण्यासाठी जागा द्या” काश्मीरमधील अत्याचाराबाबतच्या अशा आठवणी खेर यांनी यावेळी सांगितल्या.
या आधी देखील काश्मीरवर अनेक चित्रपट आले परंतु त्यामधून केवळ दहशतवादाबाबत भाष्य केलं जायचं. मात्र काश्मीरमधील आमच्या माता भगिनींवर बलात्कार करण्यात आले होते आणि ३२ वर्ष या गोष्टींना लपून ठेवण्यात आलं होत त्यामुळे ही घटना झाली नाही हा प्रपोगंडा होता असही खेर यावेळी म्हणाले.