मुंबई – दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्रीच्या ‘द कश्मीर फाईल्स’ची सतत चर्चा रंगत असते. हा सिनेमा 1989 आणि 1990 च्या काळातील काश्मिरी पंडितांवर भाष्य करणारा आहे. काश्मिरी पंडितांनी भोगलेल्या वेदना, दुःख आणि संघर्षावर प्रकाश टाकण्याचे काम या सिनेमातून झाले आहे. सोशल मीडियावर या सिनेमाला नेटकऱ्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला असून, अनेकांना सिनेमा पाहून रडू कोसळल्याचे देखील पाहायला मिळाले होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील हा सिनेमा आवडला असून त्यांनी या सिनेमाच्या टीमची भेट देखील घेतली होती. आणि सिनेमा सर्वांनी आवर्जून पाहावा असं सुद्धा सांगितलं होत. या ‘द कश्मीर फाईल्स’ प्रदर्शित झाल्यानंतर देशातलं राजकारण, समाजकारण ढवळून निघालं असल्याचं आपण पाहिलं आहे.
तर दुसरीकडे अभिनेते प्रकाश राज यांनी ‘द कश्मीर फाईल्स’ विरोधात बोलताना एका इव्हेंटमध्ये म्हटलं होतं की, ‘द कश्मीर फाईल्स’ बकवास सिनेमा आहे. पण आम्हाला माहित आहे याची निर्मिती कोणी केलीय…बेशरम कुठले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे परिक्षकही यांच्यावर थूंकतात आणि दिग्दर्शक अजून विचारतोय की सिनेमाला ऑस्कर का नाही भेटत. त्याला भास्कर पण नाही मिळणार’. असं विधान त्यांनी यावेळी केलं होत.
दरम्यान, आता प्रकाश राज यांच्या या विधानावर बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी अनुपम खेर म्हणाले, “लोक आपल्या आपल्या अकलेची जेवढी कुवत तसं बोलतात. काही लोक आयुष्यभर खोटं बोलतात. काही लोक आयुष्यभर खऱ्याच्या मार्गावर चालतात. मी त्या लोकांपैकी आहे..’ असं ते म्हणाले आहेत.