माधव विद्वांस
ज्येष्ठ नाटककार, कवी, दिग्दर्शक, निर्माते व अभिनेते असे पंचरस असलेले बाळ कोल्हटकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म सातारा येथे 25 सप्टेंबर 1926 रोजी झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाळकृष्ण हरी कोल्हटकर असे होते. त्यांना नाटकांची व लेखनाची आवड लहानपणापासूनच होती. त्यांनी लहानपणीच त्यांच्या लेखनाला सुरुवात केली होती. त्यांची प्रतिभा नाटक व नाट्यगीतांमध्ये बहरली व त्यावर त्यांनी अभिनयाचा साज चढविला.
“ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी’ या गीतांमधून त्यांनी रसिकांच्या बरोबर ऋणानुबंध कायम प्रस्थापित केले.
“जोहार’ नावाचे नाटक त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षीच लिहिले. त्यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले होते. वर्ष 1947 पर्यंत त्यांनी रेल्वेमध्ये नोकरी केली. नोकरी सोडल्यावर रंगमंचावर स्थिर होताना त्यांनी अनेक चढउतार पाहिले. तरीसुद्धा कोल्हटकरांनी या काळात नाटके व चित्रपटांच्या संहिता लिहिण्याचे काम सुरूच ठेवले.
अंबरनाथमधील प्रसिद्ध हेरंब मंदिरात “वाहतो ही दुर्वांची जुडी’, “वेगळं व्हायचंय मला’, अशी काही प्रसिद्ध नाटकं लिहिली.
नाटकाला येणारा सुशिक्षित मध्यमवर्ग लक्षात घेऊन त्यांनी आपल्या नाटकांची संहिता ठरविली होती. कुटुंबप्रधान कथानकांमुळे त्यांची नाटके रसिकांना भावली. “दुरितांचे तिमिर जाओ’ या सारख्या नाटकातून त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली. त्यांच्या नाटकातील संवाद व गीते काळजाला भिडणारी तसेच डोळ्यांना अश्रू आणीत.
“आई तुझी आठवण येते’ हे हृदयस्पर्शी गीत त्यांनी रचले. हे गीत बालाजी पेंढारकरांनी स्वतः संगीतबद्ध करून मंचावर साभिनय गायले. “मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला’ हे गीत ऐकताना आपण जणू गोकुळात असल्याचा भास होतो, इतके सुंदर वर्णन केले आहे. तसेच हे गीत वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेले कुमार गंधर्वांनी धूप रागात तितक्याच ताकदीने गायले आहे. “आली दिवाळी दिवाळी’, “उठी उठी गोपाला’, “गजाननाला वंदन करूनी’, “तू जपून टाक पाऊल जरा’ ही गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत.
“निघाले आज तिकडच्या घरी’ या दुर्वांच्या जुडी नाटकातील त्यांनी स्वतः रचलेले आणि संगीतबद्ध केलेले गीत माणिक वर्मा यांनी पिलू रागात गायले होते, हे गीत ऐकताना व नाटकात पाहताना प्रेक्षकांचे डोळे ओले झाल्याशिवाय राहात नसे.
त्यांनी अभिनेते, गीतकार आणि नाटककार म्हणून अधिराज्य केले. अशा हरहुन्नरी रंगकर्मीचे 30 जून 1994 रोजी मुंबई येथे निधन झाले.