विश्रांतवाडी (प्रतिनिधी) – करोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच पाच-पंचवीस वारकऱ्यांना पायी वारी करण्याची परवानगी द्यावी ही मागणी राज्य सरकारने नाकारली. तसेच यंदाचा वारी सोहळा रद्द केला. मात्र आता आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर 100 वारकऱ्यांना चंद्रभागा स्नान व नगरप्रदक्षिनेसाठी परवानगी द्यावी, या मागणीसाठी वारकऱ्यांनी थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. यावर उद्या, मंगळवारी सुनावणी होणार असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
याबाबतची याचिका पुणे वारकरी सेवा संघाने मुंबई हायकोर्टमध्ये सोमवारी दाखल केली आहे. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला सोहळा यंदा खंडित झाल्याने वारकऱ्यांमध्ये प्रचंड हुरहूर लागून आहे. सर्व खबरदारी घेत किमान 100 लोकांना वारीची परवानगी द्या, परंपरेतील निष्ठेचा विचार करावा, अशी आग्रही मागणी जिल्हा प्रशासन व पालकमंत्री यांच्या बैठकीत वारकरी प्रतिनिधींनी व परंपरागत चोपदार राजाभाऊ व श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समिती सदस्य माधवीताई निगडे यांनी केली होती. पण अद्याप काहीही सकारात्मक निर्णय झालेला नाही. यामुळे वारकरी खूप नाराज आहेत. आम्ही दाखवलेल्या सामंजस्य व सहकार्याच्या भूमिकेचा अति गैरफायदा घेतला की काय अशी पण भावना वारकरी व्यक्त करीत आहेत. त्यातच पंढरपूरच्या सर्व रस्त्यांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दुसरीकडे अन्य राज्यात जगन्नाथ रथयात्रेस परवानगी देण्यात आली आहे. तसेच राज्यातील सर्व व्यवहार, लग्न समारंभ, हॉटेल, व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुणे, मुबंईच नव्हे तर सर्वत्र गर्दी ओसंडून वाहत आहे. मग फक्त वारीवरच निर्बंध का लावले. वारकऱ्यांनी आजपर्यत सरकारला सहकार्य केले आहे.
मात्र आता किमान वाखरी ते पंढरपूर दरम्यान एक दिंडी व चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा यासाठी परवानगी मिळणेबाबत वारकरी आग्रही आहेत. याच मागणीसाठी वारकरी सेवा संघाच्या पुणे जिल्हाच्या वतीने थेट याचिका दाखल करण्यात आली असल्याचे वारकरी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर कामठे यांनी सांगितले.