मुंबई – नाशिक महापालिकेतील सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आ. बच्चू कडू यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर काही वेळातच 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर बच्चू कडू यांना जामीन मंजूर करण्यात आला, त्यामुळे त्यांना या प्रकरणी तूर्त दिलासा मिळाला आहे.
“न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, या निर्णयाविरुद्ध विरोधात आम्ही वरच्या न्यायालयात दाद मागणार आहोत. कोर्टात एक बाजू ऐकली जाते, परंतु अधिकाऱ्यांनी काहीही खर्च केला नाही ही बाजू बघितली जात नाही, याचे दुःख असल्याचे सांगत आ. बच्चू कडू यांनी नाशिक जिल्हा न्यायालयाच्या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली.
आ. कडू पुढे म्हणाले की, दिव्यांग बांधवांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते. अनेकदा तत्कालीन आयुक्तांना पत्र देऊनही आम्हाला उत्तर मिळाले नाही. आम्ही तिथे मौजमजा करायला गेलो नव्हतो. ज्यांना हात-पाय, डोळे नाहीत, अशा दिव्यांग बांधवांच्या हक्काचा निधी हे अधिकारी खर्च करत नाहीत, म्हणून आम्हाला आंदोलन करावे लागले. आम्ही आंदोलन केलं म्हणून आम्हाला शिक्षा सुनावली. याउलट आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ का आली? याचा तपास करायला हवा. हे का तपासले जात नाही? असा सवाल करत आ. कडू यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
हो, मी घरी बसून कारभार केला, पण आता तुम्ही बांधाबाधांवर जा आणि शेतकऱ्यांना… – उद्धव ठाकरे
अधिकाऱ्यांना बढती आम्हाला शिक्षा
जिल्हा न्यायालयाच्या सुनावणीनंतर आ. कडू यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर भलीमोठी पोस्ट केली. “दिव्यांग बांधवांसाठीच्या निधीचे 3 वर्षांपासून वाटप होत नाही, म्हणून संबंधित आयुक्ताला 4 वेळेस पत्र देण्यात आले. दोन वेळेस दिव्यांग बांधवांनी आंदोलन देखील केले. विधानसभेत देखील या संबंधित आवाज उठविण्यात आला, तरीदेखील आयुक्ताने हा निधी खर्च केला नाही. यानंतर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन केले म्हणून आम्हाला 2 वर्षे शिक्षा व संबंधित अधिकाऱ्याची बढती, हा कुठला न्याय झाला? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.