Bachhu kadu on bjp । अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना भाजपाने याच मतदारसघातून लोकसभेचे तिकीट दिलं. त्यानंतर नवनीत राणा यांनी भाजपात अधिकृतपणे प्रवेशदेखील केला. मात्र, नवनीत राणा यांच्या लोकसभेच्या उमेदवारीवरून महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे दिसत आहे. कारण राणांच्या उमेदवारीला आमदार बच्चू कडू यांनी कडाडून विरोध केलाय. तसेच “नवनीत राणा यांना निवडणुकीत पाडणार”, असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय.
… हा निर्णय महायुतीकडे Bachhu kadu on bjp ।
दरम्यान, शनिवारी रात्री बच्चू कडू यांनी जालन्यात माध्यमांशी बोलताना, “मला असं वाटतं की आता अमरावतीचं पोस्टमार्टेम झालेलं आहे. त्यात काही राहिलेलं नाही. आता केवळ निकाल बाकी आहे. या मतदारसंघात आमचाच उमेदवार निवडून येईल. मी आधीच सांगितलं आहे की आमची लढत ही मैत्रीपूर्ण आहे. अमरावती जिल्ह्याबाबतचा पुढचा निर्णय महायुतीने घ्यायचा आहे. आमची लढाई राणांविरोधात आहे युतीविरोधात नाही. आम्ही युतीतून बाहेर पडावं, युतीत राहावं की मैत्रीपूर्ण लढावं हा निर्णय महायुतीकडे असेल. तो चेंडू महायुतीच्या कोर्टात आहे. याबाबत ते लोक घेतील त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू.
आमची लढाई ही याच हुकूमशाहीविरोधात Bachhu kadu on bjp ।
बच्चू कडू म्हणाले, आम्हाला नवनीत राणांचा राग नाही. परंतु, नवनीत राणा यांच्याबद्दल उच्च न्यायालयाने १०० पानांचा निकाल दिला आहे. त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की, जातप्रमाणपत्राच्या प्रकरणात सगळी बनवाबनवी केली आहे. त्यामध्ये त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यापासून ते देशद्रोहापर्यंतचे उल्लेख आहेत. असं असूनही सर्वोच्च न्यायालयाने अडीच वर्षे याप्रकरणी निकाल दिलेला नाही. दुसऱ्या बाजूला न्यायालयात त्यांच्याविरोधात खटला चालू असूनही त्यांना उमेदवारी दिली जाते. ही हुकूमशाही असून आमची लढाई ही याच हुकूमशाहीविरोधात आहे.
अचलपूरचे आमदार म्हणाले, रवी राणांचं वागणं अतिशय संताप निर्माण करणारं आहे. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविरोधात प्रचंड नाराजी आहे. मी एकवेळ स्वतःचा अपमान सहन करेन. परंतु, माझ्या कार्यकर्त्यांचा अपमान सहन करणार नाही. आमचे कार्यकर्ते म्हणाले आहेत की, अपमान सहन करण्यापेक्षा आपण युतीबाहेर पडू.