नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. याच वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसकडून देशभरात आंदोलन होत असतानाच आता ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट’चे अध्यक्ष मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी केंद्राच्या महागाईच्या निर्णयावर निशाणा साधला आहे.
‘भारताचा पैसा अर्थमंत्र्यांकडे आहे. एखादी व्यक्ती खरेदी करण्यासाठी नेमका किती पैसा खर्च करते हे त्यांना कसे कळणार? मंत्र्यांसाठी महागाई कधीच नसते’, अशी टीका अजमल यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्यावर केली. भाजपा खासदारांनी त्यांच्या पत्नींना विचारावे की त्या किचन कसे चालवतात? असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.
#WATCH | Guwahati:AIUDF chief says, “…India’s money is with FM. How will she know how much a person spends to buy? No inflation for any Min. BJP MPs should ask their wives how’re they running the kitchen. Govt should take note otherwise inflation will eat up their Govt in 2024” pic.twitter.com/B1Tk4IChwZ
— ANI (@ANI) August 6, 2022
महागाईबाबत सरकारने वेळीच दखल न घेतल्यास येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महागाई सरकारला खाऊन टाकेल, असा इशारा त्यांनी दिला. महागाईच्या मुद्द्यावरुनच भाजपा सरकार सत्तेत आले. मात्र, आता ८ वर्षांच्या त्यांच्या सत्ताकाळात महागाईने उच्चांक गाठला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर दुपटीने वाढले आहे. त्यामुळे गरिबांचे हाल होत असल्याचे टीकास्त्र अजमल यांनी मोदी सरकारवर सोडले.
देशातील महागाईच्या विषयावर सोमवारी लोकसभेत चर्चा झाली. यावेळी बोलताना देशाची आर्थिक स्थिती चांगली असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटले होते. या त्यांच्या वक्तव्यावर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून टीका करण्यात आली होती.