निगडी, (वार्ताहर) – आज जमिनी विकतील तर उद्या काय खातील? असे परखड मत सरस्वती खंडू भोंडवे यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या यशवंत-विठाई सन्मान सोहळ्यात सन्मान स्वीकारताना त्या बोलत होत्या.
हा सोहळा ऑटोक्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, चिंचवड येथे घेण्यात आला. रावेत येथील कृषिनिष्ठ शेतकरी शांताराम खंडू भोंडवे आणि त्यांच्या मातोश्री सरस्वती खंडू भोंडवे यांना 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक ह. भ. प. किसनमहाराज चौधरी, कृषिभूषण उद्योजक सुदाम भोरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी श्री गणेश रोडलाईन्सचे संचालक तेजस डेरे (यशवंतराव चव्हाण उद्योगभूषण पुरस्कार), कोयाळी, तालुका खेड येथील स्नेहबन संस्थेच्या अशोक देशमाने यांना (यशवंतराव चव्हाण युवा सन्मान) प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी, यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय वारसदार सध्याच्या राजकारणात कोणीही दिसत नाही! अशी खंत व्यक्त करून, यशवंतराव चव्हाण हे व्यक्तिमत्त्व सर्व देशाला प्रेरक आहे. त्यांच्यासारखा सत्यपूजक नेता, व्यासंगी साहित्यिक, आदर्श राजकारणी आणि बेरजेचे राजकारण करणारा द्रष्टा धुरंधर पुन्हा होणे नाही! असे गौरवोद्गार काढले.
पुरस्कार वितरणाच्या प्रारंभी बाजीराव सातपुते यांनी ‘यशवंतराव इतिहासाचं एक पान…’ या छोटेखानी व्याख्यानातून भावोत्कट शब्दांतून यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट साकारला. वर्षा बालगोपाल यांनी मानपत्राचे वाचन केले. संगीता झिंजुरके यांनी वाद नसाया पाहिजे… या स्वरचित गीताचे गायन केले.
मुरलीधर साठे, एकनाथ उगले, सुप्रिया सोळांकुरे, प्रभाकर वाघोले, फुलवती जगताप, मुकुंद आवटे, सायली संत, अरुण गराडे यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. मुरलीधर दळवी यांनी आभार मानले.