देहूरोड,(वार्ताहर) – देहूरोडमधील मोरबा चाळीत ५० कुटुंब राहतात. येथे येण्यासाठी अरूंद गल्लीतून यावे लागते. गेल्या ५० वर्षाच्या कालावधीत या ठिकाणी पथदिवे बसविण्यात आलेले नाही. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे वारंवार पाठपुरावा करूनही पथदिवे लावले जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
मोरबा चाळीत गेल्या तीस वर्षांपासून सुमारे ५० कुटुंबे राहत आहेत. मात्र, या कुटुंबांना नागरी सुविधा मिळत नसल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या घरी जाण्यासाठी दोन बिल्डिंगमधील अडीच-तीन फूट रुंदीच्या अरुंद जागेतून जावे लागते, असे असतानाही येथे पथ दिव्यांची सोय नाही.
अंधार असल्याचा गैरफायदा घेत काही नागरिक या जागेचा लघुशंकेसाठीही उपयोग करतात. त्यामुळे, या रस्त्यावर दुर्गंधीही पसरली आहे. त्याचप्रमाणे सापासारखे प्राणीही येथे येत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
मोरबा चाळीतील नागरिकांना ये-जा करण्यासाठीच्या रस्त्यावर देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने पथदिवा लावावा, यासाठी स्थानिक नेत्यांनी कॅन्टोन्मेंटकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र, कॅन्टोन्मेंटकडे वीजेचा दिवा उपलब्ध नसल्याचे हास्यास्पद कारण देत कॅन्टोन्मेंट बोर्ड देत आहे.