मुंबई : शिंदे, फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचेही लक्ष लागले आहे. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यापूर्वी होण्याची शक्यता होती. पण, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळे सरकारमधील आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. यावर आता प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी आपले मत मांडले आहे.
मंत्रिमंडळ विस्तारावरुन प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. मात्र राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्ताराबाबत आता बच्चू कडू यांनी आशा सोडली असल्याचं चित्र आहे. कारण आता मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही, असं स्वत: बच्चू कडू म्हणत आहेत.
मनसे सत्तेत येऊ शकते, त्यांचा एकच आमदार आहे. जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि त्यांना मंत्रिपद मिळाल तर नक्कीच राज ठाकरे सत्तेत येतील. पण मला नाही वाटत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल.. मंत्रिमंडळाचा विस्तार आता २०२४ नंतरच होईल, असं बच्चू कडूंनी म्हटलं.
बच्चू कडू यांनी यापूर्वीही दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी आपले मत मांडले आहे,”आमच्या सरकारचा कार्यकाळ सात ते आठ महिने उरला आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार करून नाराजी ओढावून घेण्याची मानसिकता सरकारची नाही. म्हणून मला वाटतं, मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यापेक्षा ‘जैसे थे’ स्थितीत सरकार चालवणं योग्य आहे.”असं म्हणत त्यांनी आपलं मत मांडलं होत.