मुंबई – महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा काल (सोमवारी) मुंबईतील बीकेसी मैदानावर पार पडली. यावेळी तिन्ही पक्षातील नेतेमंडळी उपस्थित होते. या सभेत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोरदार टीका केली. यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरे यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त कळवा (पश्चिम) येथे आयोजित केलेल्या ‘मराठी बाणा’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. “बऱ्याच लोकांना मुख्यमंत्री व्हायची स्वप्नं पडली आहेत. सकाळी एकाला, दुपारी एकाला आणि संध्याकाळीही एकाला मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न पडतात. ते उबाठावाले आहेत त्यांना काय बोलायचं हे सुचतच नाही. त्यांना स्वप्न पाहत राहू दे. शेवटी आमदार असो की मुख्यमंत्री, कुणाला बसवायचे आणि कुणाला उतरवायचे हे सर्व जनतेच्या हातात असते,” असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.
पुढे ते म्हणाले की, “निवडणुका आल्या की, काही लोक म्हणतात मुंबई तोडणार असे म्हणतात. कोण मुंबई तोडणार आहे? कुणीच मुंबई तोडण्याची हिंमत करू शकत नाही. ही हिंमत करताही येणार नाही. हे स्वप्न कुणी पाहू नये. मुंबई तोडणार असं सांगून मुंबईकरांची मतं घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या प्रयत्नाला यश मिळणार नाही. कारण मुंबईत आम्ही काम करत आहोत. मुंबई बदलते आहे हे मुंबईकर जाणून आहे.”
यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी ठाणेकरांचे आभार देखील मानले. “मुख्यमंत्री झाल्यावर मला महाराष्ट्रात जाण्याचा योग आला. अनेक ठिकाणी सत्कार समारंभही झाले. परंतु आजचा सत्कार ठाणेकरांचा, आपल्या परिवारातील आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी मोठा आहे. नजर पोहचते तिथपर्यंत लोक बसलेले आहेत. खरं म्हणजे मुंबईत आज एक सभा आहे. तिकडे खूप मेहनत करून लोकांना आणलं आहे, पण इकडं काही न करता अशोक हांडेंचा चमत्कार दिसत आहे. खरी एकजूट आणि विकासाची वज्रमुठ याठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणून मी उपस्थित सर्वच ठाणेकरांचं मनापासून स्वागत करतो.”