मुंबई – पक्षबांधणीसाठी राज्यभर दौऱ्यावर असलेल्या माजी मंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा देऊन त्यांच्याविरोधात वरळीमधून निवडणूक लढण्याचे चॅलेंज दिले होते. मुख्यमंत्री शिंदेंनी देखील ठाकरेंच्या या आव्हानाला प्रत्युत्तर दिले मात्र त्यांनी हे आव्हान स्वीकारलं नाही. आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना नवीन आव्हान दिल असून, एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या या चॅलेंजला आता शिंदे गटाचे आमदार आणि प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘तुम्हाला एवढीच हौस असेल तर शिंदे साहेबांच्या मतदारसंघात जाऊन तुम्ही लढा’ असा सल्ला बच्चू कडू यांनी दिला आहे.
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन वरळी मतदारसंघातून लढावं असं आवाहन दिलं होतं, यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ‘असे आव्हान देणे हे पोचट झालं आहे. या आव्हानाला काही अर्थ नाही. हा बालिशपणा आहे जेव्हा विधानसभा निवडणूक होईल तेव्हा आव्हान दिले पाहिजे.” असा टोला आमदार बच्चू कडू यांनी लगावला आहे.
आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले…
“वरळीतून लढून दाखवण्याचं मी काल सुद्धा मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं आहे. वरळीतून नाही तर ठाण्यातून तरी लढून दाखवा असं मी त्यांना सांगितलं. मी त्यांना आणखी एक चॅलेंज देतो. त्यांची माझ्या विरोधात लढण्याची हिंमत किंवा ताकद नसेल तर येत्या अधिवेशनात राज्यपालांचं भाषण होण्याऐवजी महाराष्ट्र द्वेष्ट्या राज्यपालांना बदलून दाखवाव’ असं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिले.