Bachchu Kadu : राज्यात मराठा आरक्षणावरून सत्ताधारी आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यात देण्यात आलेली डेडलाईन आता उद्या संपणार आहे. त्यातच सरकारकडून याबाबत ठोस पाऊल उचलले नसल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत असताना जरांगे यांची समजूत काढण्यासाठी आणि मुदत वाढवून मिळावी यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि संदीपान भुमरे यांनी दोन दिवसांपूर्वी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. परंतु या भेटीत कोणताही तोडगा निघाला नाही. तसेच या चर्चेवेळी ‘सोयरे’ या शब्दावरून बराच वेळ वाद चालू होता.
राज्य सरकारने मागील चर्चेवेळी सोयरे शब्दाला संमती दर्शवली होती. परंतु, आता ते शक्य नाही असं सांगितलं जात आहे. त्यावरून राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील चर्चा निष्फळ ठरत आहेत. यावरून आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे. बच्चू कडू यांनी,”सरकारने मनोज जरांगे यांना काही शब्द दिले होते. परंतु, सरकारला ती आश्वासनं पूर्ण करता आली नाहीत, हे दुर्दैवी आहे.” असे म्हणत सरकारलाच टोला लगावला आहे.
पुढे सरकारच्या भूमिकेविषयी बोलताना आमदार बच्चू कडू यांनी, मुळात सोयरे म्हणजे जिथे आपली सोयरीक होऊ शकते. आपली सोयरीक आपल्या जातीत होते, असं मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे. परंतु, सरकारने सोयरे शब्दाचा चुकीचा अर्थ काढला. त्यामुळे आधी सोयरे या शब्दाची व्याख्या करणं गरजेचं आहे. व्याख्या झाली तर आपल्याला पुढे जाता येईल. मागच्या बैठकीवेळी आपण सरकारला काही शब्द दिले, सरकारनेही आपल्याला काही शब्द दिले होते. परंतु, सरकारने दिलेले शब्द पाळले नाहीत, हे खूप दुर्दैवी आहे. त्यामुळे मराठा समाजाला असं वाटतं की मागच्या वेळी झाली तशी फसणवूक आता होऊ नये.”या असे त्यांनी म्हटले.
पुढे बच्चू कडू यांनी,”याविषयी आपलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झालं आहे, असं सांगत बच्चू कडू म्हणाले, सरकारला आता जर एखादा शब्द द्यायचा असेल तर आधी त्याचा पूर्ण विचार करून द्यावा. शब्द दिला आणि तो पूर्ण करू शकलो नाही तर त्याचा समाजमनावर परिणाम होतो. लोकांच्या मनात सरकारविरोधात भावना निर्माण होतात. उग्र प्रतिक्रिया उमटू लागतात.” असे म्हटले.