Ayodhya : अयोध्या नगरीत २२ जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. सोहळा होण्यापूर्वी अभूतपूर्व असा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अयोध्या नगरीला एका अभेद्य किल्ल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मंदिराच्या उदघाटन सोहळ्याच्या दिवशी अयोध्या शहरात प्रवेश करताना शहरातील नागरिकांनाही आपले ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. मंदिराच्या सुरक्षेसाठी तीन स्तरीय सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
उदघाटन सोहळ्याला हजारोंच्या संख्येने नागरिक येणार असून त्यात अतिमहत्वाच्या व्यक्तींचाही समावेश आहे. सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी केवळ उत्तर प्रदेश पोलीस दलच नाही तर केंद्रीय सुरक्षा संस्थाही सतर्क आहेत. स्थानिकांना कोणता त्रास होणार नाही याची खबरदारी घेत त्यांना ओळखपत्रे देण्यात आली आहेत.
आज म्हणजे शनिवारीच अयोध्येच्या सीमा बंद करण्यात आल्या असून बाहेरच्या व्यक्तींना प्रवेशास बंदी करण्यात आली आहे. या परिसरातील वर्दळ ध्यानात घेत शुक्रवारी रात्री येथील वाहने अन्य मार्गांकडे वळवण्यात आली आहेत. अमेठी, सल्तानपूर, गोंडा, लखनौ, बस्ती येथून अयोध्येकडे येणाऱ्या गाड्या वेगवेगळ्या मार्गांनी त्यांच्या ठिकाणांकडे वळवण्यात आल्या आहेत.
केंद्रीय राखीव पोलीस दल आणि पीएसीही मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे. अयोध्या शहरातही उत्तर प्रदेश पोलिसांची कुमक वाढवण्यात आली आहे. एआय, सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून सगळीकडे लक्ष ठेवले जाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारी रोजी यजमान म्हणून सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यांच्या हस्तेच राम मंदिराचे उदघाटन होणार आहे.
खास पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी असलेल्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचाही सुरक्षा व्यवस्थेत समावेश करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश पोलीस आणि पीएसीचे १४०० जवान मंदिराच्या अगदी बाहेर रेड झोनमध्ये तैनात केले जाणार आहेत. त्यामुळे आता अयोध्या नगरीला अभेद्य किल्ल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.