Ayodhya Ram Mandir Invitation : अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण सोहळ्यासाठी देशभरातील दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात येत आहे. त्यातच राज्यात महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनादेखील निमंत्रण देण्यात आले आहे. त्यावरून सध्या राज्यात राजकीय वर्तुळात गोंधळ निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांच्याविषयीची माहिती देताना भाजप नेते गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्या येण्यावर मोठे विधान केले आहे.
गिरीश महाजन आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी “राम मंदिरावरुन उद्धव ठाकरे हे नेहमी टीका करत असतात त्यामुळे उद्धव ठाकरेंना बोलवण्याचं कारण काय?’असा सवाल गिरीश महाजनांनी केला आहे. पुढे बोलताना त्यांनी, “केंद्राच्या व्हीव्हीआयपी यादीत उद्धव ठाकरे नसतील मात्र राज ठाकरे असतील. अयोद्धेच्या राम मंदीरावरुन आमच्यावर टीका केलीय त्यांना बोलवण्याचं कारण काय? उद्धव ठाकरेंचं अयोद्धेच्या राम मंदिराच्या उभारणीत काय योगदान हे सर्वांना माहिती आहेत. ते साधे एमएलसी तेही पहिल्या टर्मचे आहेत. त्यामुळे कदाचित केंद्राच्या व्हीव्हीआयपींच्या लिस्टमध्ये ते नसतील किंवा आणखी काही कारण असेल.” अशी माहिती यावेळी गिरीश महाजन यांनी दिली.
यावेळी बोलताना गिरीश महाजनांनी संजय राऊत यांचाही समाचार घेतला. गिरीश महाजन म्हणाले, “घरी बसून भूमिका घेण्यात आणि प्रत्यक्ष करण्यात फरक आहे. राज्याला आणि देशालाही माहिती आम्ही कारसेवक जेलमध्ये होते. घरात बसून भूमीका घेणं आणि प्रत्यक्ष कारसेवा करणं यात फरक आहे. आम्ही 20 दिवस जेलमध्ये होते. संजय राऊत, उद्धव ठाकरे त्यावेळी कुठे होते? बाळासाहेब ठाकरेंच्या भूमीकेबाबत दुमत नाही. मात्र जे बोलतायेत ते आयत्या बिळावरचे नागोबा आहे. संजय राऊतांनी, उद्धव ठाकरेंनी कारसेवेचा एखादा फोटो दाखवावा.” असे थेट आव्हान देखील यावेळी त्यांनी दिले.
मनोज जरांगेविषयी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, “मनोज जरांगे पाटलांना मुंबईत यायची गरज पडणार नाही. त्याआधीच एक महिन्याच्या आत पर्मनंट आरक्षण मिळेल. जलद गतीनं काम सुरु आहे. छगन भुजबळांना विनंती केली आहे की आपापसांत भांडू नका. टीका करुन दोन समाजात तेढ निर्माण करु नका.” असे त्यांनी यावेळी म्हटले.