कात्रज – कात्रज चौक ते नऱ्हे गाव रस्त्यावर दररोज सकाळी मिक्सर व डंपर, हायवा अशा वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंद असूनही अवजड वाहने धावत आहेत. सकाळी आणि संध्याकाळी विशिष्ट वेळेत अवजड वाहनांना बंदी असताना या सूचनेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून पादचारी तसेच दुचाकी चालकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
कात्रज चौकातून या रस्त्यावरून आंबेगाव, जांभुळवाडी, दत्तनगर, कोळेवाडी या भागाकडे जाणारे कर्मचारी सकाळी-संध्याकाळी दुचाकी व अन्य वाहनाने जा-ये करतात. यामध्ये अवजड वाहनांची भर पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे, अशा वाहनांमुळे रस्त्याचीही दुर्दशा झाली आहे. दत्तनगर, आंबेगाव तसेच जांभुळवाडी, कोळेवाडी परिसरातील नागरिकांकडून या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, दररोजची वाहतूक कोंडी ही नागरिकांची दररोजची समस्या झाली आहे.
कात्रज चौकात अवजड वाहनांना वेळेचे बंधन सूचीत करणारा फलकही लावण्यात आला आहे. स्पष्ट मराठी भाषेत सकाळी व संध्याकाळी अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी, अशी सूचना असतानाही अवजड वाहनांचे चालक याकडे दुर्लक्ष करीत अशी वाहने वेगाने चालवित आहेत.
रिक्षांचा अडथळा…
कात्रज चौकामध्ये अनधिकृतपणे रिक्षा स्टॅन्ड आहे. त्यामुळे देखील वाहतूक कोंडी होते. अनेक रिक्षांमधून कात्रज चौक ते नऱ्हे गावाकडे अनधिकृतपणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक केली जाते. कात्रज चौकात बसस्थानकासमोरील रस्त्याच्या बाजूलाही अनधिकृतपणे रिक्षा थांबे करण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
“अनधिकृत वाहने व रस्त्यावर थांबणाऱ्या रिक्षा तसेच नियम भंग करून रस्त्यावर वाहतूक करणारी अवजड वाहने यांच्यावर कारवाई अधिक तीव्रतेने करण्यात येत आहे.” – प्रशांत कणसे, सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग भारती विद्यापीठ