– प्रमोद ठोंबरे
बारामती – बारामतीतील पियाजिओ कंपनीला वाहन उद्योगातील आर्थिक मंदीचा जबरदस्त फटका बसला आहे. त्यामुळे या कंपनीवर अवलंबून असलेले 60 टक्के छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. या व्यावसायिकांकडे रोजदांरीवर असलेल्या अनेक कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली असल्याने बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरम्यान, तीन-चार दिवसांपूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी “आर्थिक बुस्ट’ दिला असला तरी यातून सावरताना किमान वर्षभराचा कालावधील जाईल, असा अंदाज या छोट्या व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
पियाजिओ व्हेईकल्स या कंपनीसाठी काम करणारे 90 टक्के छोटे उद्योजक बारामती एमआयडीसीमध्ये आहेत. सध्या, आर्थिक मंदीमुळे कंपनीने उत्पादन एकदमच घटवले असल्याने छोटा उद्योगांच्या कामात मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्राच्या बाबतीत सरकार वेळोवेळी विविध नियमांची घोषणा करून त्याची अंमलबजावणी देखील त्वरित करीत आहे. सध्या, सरकार इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. मात्र, सध्याच्या वाहन उत्पादनांबाबत बोलण्यास तयार नाही, त्यामुळे नवीन वाहन निर्मिती करावी की नाही या मन:स्थितीत उद्योजक आहेत. परेदशी कंपन्यांनीही या व्यावसायात शिरकाव केल्याने ग्राहकांकडेही चॉईस उपलब्ध झाले आहेत, या कारणातून वाहन विक्रीतील शेअर विविध कंपन्यांत विभागले गेले आहेत. यातूनही नवी वाहने शोरूम तथा कंपन्यांच्या गोदामात गेल्या वर्षांपासून उभी आहेत.
जागतिक मंदीही वाढत असल्याचा परिणाम आता वेगाने जाणवू लागल्याचे छोट्या व्यावसायिकांचे म्हणणे आहे. याच करणातून उत्पादनाचे प्रमाण कमी झाल्याने याचा परिणाम यावर आधारित छोट्या व्यावसायिकांवरही होतो आहे.
पियाजिओ कंपनीच्या माध्यमातून आमच्या सारख्या छोट्या उद्योजकांना मिळत असलेल्या कामावर 50 टक्के परिणाम झाला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून प्रत्येक शनिवारी-रविवारी कंपनीचे काम बंद राहिले;त्यामुळे जवळपास 3 हजार 500 वाहनांचे उत्पादन कमी झाले. कंपनीचे कोटींग पावडरचे 50 टक्के काम आमच्या कंपनीकडे असते सध्या मंदी असल्याने कामावर परिणाम जाणवत आहे. भविष्यात ही परिस्थिती सुधारले नाही तर छोटे उद्योग अडचणीत येतील तसेच बेरोजगारीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहे.
– शहाजी रणवरे, संचालक स्पेक्ट्रम कोटींग पावडर, स्मेअर्स प्रायव्हेट लिमिटेड
बारामती एमआयडीसीमधील बहुतांश उद्योग हे पियाजिओ कंपनीवर अवलंबून आहेत. मात्र, सध्या कंपनीने उत्पादन प्रचंड घटवल्याने बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. महिन्यातील काही दिवस कामगारांना घरी बसावे लागत आहे. त्यामुळे ठेकेदारी पद्धतीने कामकाज करणाऱ्या कामगारांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. बारामती एमआयडीसीसाठी पियाजिओ कंपनी खूप महत्त्वाची आहे. मात्र, आर्थिक मंदीमुळे कंपनीचे उत्पादन कमी होत असल्याने कंपनीवर अवलंबून असलेल्या बारामती एमआयडीसीतील 60% उद्योग व्यवसाय अडचणीत आले आहेत.
– भारत जाधव, मालक, आरती एंटरप्राइजेस, बारामती
बारामती एमआयडीसीतील उद्योग धंदे अडचणीत आले आहेत. त्यामुळे ट्रान्सपोर्ट कंपन्यादेखील देखील बंद पडण्याची वेळ आले आहे. पूर्वी महिन्यातून चार खेपा दक्षिण भारतात होत असत सध्या परिस्थितीत मात्र काही गाड्यांना दोन महिन्यातून एक तर काही गाड्यांना एक महिन्यातून एखाची खेप मिळत आहे, त्यामुळे ट्रान्सपोर्ट कंपन्यांवरील आर्थिक ताल वाढत चालला आहे. मिळणारे उत्पन्न आणि वाहतुकीसाठी होणारा खर्च याचा ताळमेळ बसत नाही. बॅंकांचे हप्ते, गाड्यांचा विमा, चालकांचे पगार तसेच देखभाल दुरुस्ती करणे देखील कठीण झाले आहे.
– सतीश कोकरे, मालक, किरण ट्रान्सपोर्ट, बारामती