कराड – राजकीय हेवेदाव्यांसाठी व व्यक्तीगत स्वार्थासाठी कराड शहराच्या विकासाला व नावलौकिकाला हानी पोहोचवणे घृणास्पद आहे. पालिकेच्या नगराध्यक्षा व सत्ताधाऱ्यांनी नागरिकांच्या भावनांशी खेळू नये, असा इशारा देत ठरावावर सह्या न होणे यास “तेच’ जबाबदार आहेत, असा आरोप कराड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने व नगरसेवक इंद्रजित गुजर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
पालिकेच्या मासिक सभेत मंजूर झालेल्या ठरावावर वेळेत सह्या न झाल्याने कराड पालिकेला स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग घेता येत नसेल तर याला नगराध्यक्षा व जनशक्ती सत्ताधारी आघाडी सर्वस्वी जबाबदार राहणार आहेत.
मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सभागृहातील ठराव वेळेवर प्राप्त होत नाहीत, त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणातून यावर्षी माघार घेण्याबाबत विचार करावा, असे पत्र सर्व नगसेवकांना पाठवले.
अशापद्धतीने मुख्याधिकाऱ्यांना हतबल करण्यात कोणाचा स्वार्थ आहे? पालिकेच्या नगराध्यक्षांनी जाणूनबुजून कराड शहराने नाकारलेल्या विधानसभा उमेदवाराच्या सांगण्यावरून ठरावांवर वेळेत सह्या केल्या नाहीत की काय? असा सवाल नगरसेवक माने व गुजर यांनी उपस्थित केला आहे. शहर वासियांना फसवून सत्ता स्थापनेसाठी एकत्र आलेल्या आघाड्यांनी जाणिवपूर्वक राजकीय स्वार्थाकरिता ठराव वेळेवर पाठविण्याचे टाळले असल्याचे गेल्या चार वर्षात वारंवार दिसून आले आहे.
विधानसभा निवडणुकी आधी झालेल्या सर्वेक्षणात कराड पालिका स्वच्छ सर्वेक्षणमध्ये दोनवेळा देशात प्रथम आली होती. आणि आता त्या प्रचाराचा निवडणुकीत कोणताही फायदा झाला नाही असे झाल्यामुळेच की काय? या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नगराध्यक्षांनी ठरावावर सह्याच केल्या नाहीत. यावर्षी नगरपालिकेवर नामुष्की यावी, असा डाव आखणाऱ्या नगराध्यक्षांनी समजून घ्यावे की, कराडच्या विकासाआड कोणी येत असेल तर त्याची कोणत्याही प्रकारची गय कराडची जनता करणार नाही, अशी सूचक टिपणीही केली आहे.
कराडच्या जनतेच्या स्वाभिमानाचा जर कोणी अनादर करत असेल आणि शहराच्या विकासाच्या आड जर कोणी येत असेल तर त्याला त्याच्या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. राष्ट्रीय कॉंग्रेसची भूमिका ही कराडच्या विकासाशी बांधिल आहे. यामध्ये कोणी जनतेच्या भावनांशी खेळत असेल तर अशांना योग्यवेळी उत्तर दिले जाईल, असा इशारा नगरसेवक राजेंद्र माने व नगसेवक इंद्रजित गुजर यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. दरम्यान, कॉंग्रेसकडून झालेल्या प्रतिहल्ल्याने नगराध्यक्षा व सत्ताधारी जनशक्ती आघाडी काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.