इंदूर – ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा तिसऱ्या कसोटीत 9 गडी राखून पराभव केला. या विजयाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला आहे. मात्र, या कसोटीपूर्वी भारतीय संघालाही अंतिम फेरीत निश्चित प्रवेश करता येईल असे चित्र होते त्यात आता परत बदल झाला आहे. आता न्यूझीलंड व श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेच्या निर्णयावर भारताचा प्रवेश अवलंबून राहणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र, तिसरा कसोटी सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने ही आघाडी 2-1 अशी कमी केली व भारतीय सघाचे अजिंक्यपद स्पर्धेच्या स्थानाला धक्का लागला. आता श्रीलंका संघाने न्यूझीलंडमध्ये न्यूझीलंड विरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका जिंकली तर भारतीय संघाला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागणार आहे.
अर्थात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना बाकी आहे व तो भारताने जिंकला तर संधी कायम राहणार असून त्यासाठी श्रीलंकेचा न्यूझीलंडकडून किमान एका कसोटीत तरी पराभव होणे गरजेचे आहे.
#INDvAUS 3rd Test : तिसरी कसोटी अडीच दिवसांत निकाली! भारताचा दारुण पराभव
या स्पर्धेच्या गुणतालिकेवर लक्ष टाकले तर ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 68.52 आहे, तर भारताची विजयाची टक्केवारी 60.29 टक्क्यांवर आली आहे. श्रीलंकेचा संघ तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची विजयाची टक्केवारी 53.33 टक्के आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये ओव्हल मैदानावर 7 ते 11 जून या कालावधीत खेळला जाणार असून त्यासाठी 12 जुनचा दिवस राखिव ठेवण्यात आला आहे. गेल्या वर्षी झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम लढतीत न्यूझीलंडने भारताचा पराभव करत विजेतेपद पटकावले होते.