ऍडलेड – दिवस-रात्र कसोटी सामन्यांत अपराजित राहण्याची कामगिरी ऑस्ट्रेलियाने कायम राखली आहे. गेले पाच वर्षे ऑस्ट्रेलियाने दिवस-रात्र कसोटीत एकदाही पराभव पत्करलेला नाही.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत भारताचा 8 गडी राखून पराभव केला. 2015 साली पहिल्यांदा दिवस-रात्र कसोटी सामने खेळायला प्रारंभ झाला. तेव्हापासून ऑस्ट्रेलिया अजिंक्यच राहिली आहे. पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केला होता.
तेव्हापासून आजवर ऑस्ट्रेलियाने खेळलेल्या आठही कसोटीत विजय मिळवला आहे. दिवस-रात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड, श्रीलंका व भारताचा पराभव केला आहे.
ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड व पाकिस्तानचा प्रत्येकी दोन वेळा पराभव केला आहे. दिवसरात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्कने सर्वाधिक बळी घेतले आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत दिवस-रात्र कसोटीत वर्चस्व कायम राखले आहे.