औरंगाबाद :- शहरातील नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने येत्या ५ नोव्हेंबर रोजी स्मार्ट सिटी बस नागरिकांच्या सेवेसाठी सुरु करण्यात येत असल्याची घोषणा आज पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शहरातील महानगरपालिकेच्या कामांचा आढावा आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी पालकमंत्री देसाई बोलत होते.
यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले, औरंगाबाद शहरास स्मार्ट सिटी बनविण्याच्या दृष्टीने नागरिकांना रस्ते, पाणी, शिक्षण वाहतूक आणि मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. सध्या शहरातील कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी होत आहे. येत्या ५ नोव्हेंबरपासून स्मार्ट बस सुरु होत असल्याने नागरिकांना वाहतुकीची स्मार्ट सुविधा मिळणार आहे.
यावेळी पालकमंत्री देसाई यांनी महानगरपालिकेल्या सुरु असलेल्या कामांची माहिती घेतली. त्याचबरोबर मनपा तर्फे कोरोना काळात सुरु केलेल्या उपचार सुविधा येत्या काळात सुरु ठेवण्याची सूचना त्यांनी केली. तसेच मेल्ट्रॉन रुग्णालय मनपाकडेच राहील व तेथे आणखी आरोग्य सुविधा देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.
तसेच शहरातील प्रमुख रस्त्यासह इतर सर्व रस्ते दुरुस्ती ,जालना रस्त्याला समांतर रस्ता करणे आदी कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. तसेच शहरातील गुंठेवारी वसाहतीतील नागरिकांना मालकी हक्क् व सिडकोच्या मालमत्ता नियमित करण्याबाबतचा प्रश्न, पंतप्रधान आवास योजनेतून लाभार्थ्याना घरे मिळणे, नवीन पाणीपुरवठा योजना, सिध्दार्थ गार्डनमधील विकास कामे, तसेच मिटमिटा परिसरात विकसित केल्या जाणाऱ्या सफारी पार्कला जागतिक पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकसित करण्याबाबत सूचित करुन इतर महत्वपूर्ण कामांचा आढावाही पालकमंत्री देसाई यांनी यावेळी घेतला.
यावेळी मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी मिटमिटा परिसरातील सफारी काम तीन टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात 60 हेक्टर जागेवर संरक्षक भिंत, प्रवेश व्दार, सपाटीकरण करणे या कामाची सुरवात तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारणीच्या कामाची , शहरातील रस्त्याच्या कामाची नोव्हेबर मध्ये सुरुवात करणार असल्याची माहिती दिली. सफारी पार्क येथील उर्वरित जागेवरील 17 हेक्टरवर’लायन सफारी’ करण्याबाबत आराखड्याचा प्रस्ताव मंजूरीसाठी पाठवला असल्याची माहिती दिली.
तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत निधीचा योग्य विनियोग होत असून मनपातर्फे कचरा व्यवस्थापन करण्यात येत आहे.कचरा डेपेात कचरा प्रक्रीया केद्राचीही कामे सुरु आहेत. शहरात स्वच्छता मोहिम 1 नोव्हेंबर ते दिवाळीपर्यत राबविण्यात येत असून शहराला स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या 10 शहरात स्थान मिळवून देण्याचा मानस असल्याचाही पांडेय यावेळी म्हणाले.
संत एकनाथ रंगमंदिर नाटयगृहाचे काम येत्या डिसेंबरमध्ये पूर्ण होईल् तर संत तुकाराम नाटयगृहाचे काम दुरुस्तीसाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच शहरातील हॉटेल अमरप्रीत चौक् येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प तयार करणे (म्युरल), सिडको कॅनॉट प्लेस येथे महाराणा प्रताप यांचा पुतळा, विवेकानंद गार्डन येथे महात्मा फुले यांचा पुतळा तर शहागंज येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळयाचे सुशोभिकरण करण्याचे कामे झाली आहेत. त्याचबरोबर औरंगपुरा येथील भाजीमंडईचे काम 1 वर्षात तर शहागंज भाजीमंडईचे काम सहा महिन्यात पूर्ण होईल त्याचबरोबर शहरातील पार्किग व्यवस्था ,हॉकर्स् झोन करण्याबाबत कार्यवाही सुरु असल्याची माहितीही
मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी पालकमंत्री देसाई यांच्या आढावा बैठकीत दिली.