मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या असून यंदाची कोजागिरी पौर्णिमा सर्वांच्या जीवनात धन, धान्य, उत्तम आरोग्याची समृद्धी घेऊन येवो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, भारतीय संस्कृतीत कोजागिरी पौर्णिमेचं अध्यात्मिक, कृषीदृष्टीनं अनन्यसाधारण महत्त्व आहे. निसर्गाशी नातं सांगणारा हा सण आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री सर्वांनी एकत्र येत दूध पिऊन हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. कोकणात भात, नाचणी, वरीसारख्या धान्याचं पूजन करुन नवान्न पौर्णिमा म्हणून हा सण साजरा होतो.
कोजागिरी साजरी करण्याच्या या अनेकाविध प्रथा हे आपलं सांस्कृतिक वैभव आहे. हे वैभव टिकवण्याचा, वाढवण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून करुया. यंदाची कोजागिरी पौर्णिमा कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करुन, स्वत:ची, कुटुंबाची, समाजाच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन साजरी करावी, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.