करोना या विषाणूच्या संसर्गापासून बचावासाठी एकच उपाय म्हणजे त्याची साखळी तोडणे. पण हे काम महाकठीण आहे. कारण त्यामुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावू शकते. विशेषत: गरीब आणि व्यापारी वर्गासाठी अशा प्रकारची कृती हानीकारक आहे. त्यामुळे सरकारने अशा लोकांसाठी सामाजिक सुरक्षा आणि अत्यावश्यक वस्तूंची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करायला हवेत. जेणेकरून ते या संकटाचा सामना करू शकतील. अर्थात एवढेच पर्याय पुरेसे नाहीत. आपल्याला काही पायाभूत सुविधांचा देखील विचार करायला हवा.
भारत सध्या करोना व्हायरसच्या सर्वांत भयावह टप्प्याच्या उंबरठ्यावर म्हणजेच कम्युनिटी ट्रान्समिशन (समूह संसर्ग)जवळ येऊन ठेपला आहे. त्यामुळे सरकारने सर्वप्रकारच्या आर्थिक व्यवहार आणि सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन केले आहे. सध्याच्या काळात अशा प्रकारची कृती करणे आवश्यक आहे. कारण कम्युनिटी ट्रान्समिशनने निर्माण होणारी स्थिती ही आकलनापलिकडची राहू शकते. एखादी किरकोळ गोष्ट कमी काळात एवढे मोठे विक्राळ रूप धारण करू शकते, हे अलिकडच्या काळात कधी जगाने अनुभवले नाही. एकंदरित करोना व्हायरसमुळे जगाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
जानेवारीत पहिल्यांदा चीनमधील करोना व्हायरसबाबत खबर लागली. अर्थात चीनमध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पहिला रुग्ण सापडला. परंतु जगाला ही बातमी नव्या वर्षात कळाली. हा संसर्ग पसरला आणि परिणामी चीनमध्ये बळी जाऊ लागले होते. बाधित आणि मृतांची संख्या वाढू लागली. त्यामुळे सरकारकडून लोकांना जबरदस्तीने घरात कैद केले जात होते. रातोरात हॉस्पिटल तयार करण्यात आले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आल्याचे वाटू लागले होते. परंतु सुरुवातीच्या काळात एखाद्या देशापुरता मर्यादित वाटणारा संसर्गाचा झटका हा कालांतराने सर्वांना बसला. हा एक जागतिक अर्थव्यवस्थेला झटका होता. चीनमधील आरोग्य यंत्रणा पाहता या संकटापासून चीन सहजपणे बाहेर पडेल, असे वाटत होते. कालांतराने तेथील स्थिती सामान्य होत गेली, परंतु या व्हायरसने आपला मुक्काम हलविला.
इटली आणि इराणचे आयुष्य पार उद्ध्वस्त करून टाकले. इटलीत संपूर्ण गोष्टी हाताबाहेर गेल्या. इराणमध्ये तर अक्राळविक्राळ रूप धारण झाले आहे. आता जवळपास सर्वच देशांत हा संसर्ग पसरला आहे. या घडीला अनेक देशांत लॉकडाऊनची स्थिती आहे. ही गोष्ट खरोखरच विश्वसनीय वाटत नाही. भारतात आजघडीला बारा हजारांहून अधिक रुग्ण झाले आहेत. मृतांचा आकडा देखील चारशेपार पोचला आहे. अर्थात ही आकडेवारी अन्य देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. इटलीत सुमारे 1 लाख 63 हजार प्रकरणे आहेत तर अमेरिकेमध्ये 6 लाख 16 हजारांहून अधिक करोनाबाधित आहेत. प्रत्येक सहा दिवसाला रुग्णांची संख्या दुप्पट होत चालली आहे.
भारतातही करोना व्हायरसबाधित रुग्णांची संख्या यापेक्षा अधिक असू शकते, असे सांगितले जात आहे. चाचणीचे प्रमाण मर्यादित असल्याने देशातील खरा आकडा समोर येत नसल्याचे बोलले जात आहे. परंतु प्रश्न इथेच निर्माण होतो. भारतासारख्या देशात आरोग्य यंत्रणा सक्षम नाही, चाचण्यांचे प्रमाणही मर्यादित आहे. म्हणून याचा सामुदायिक प्रसार अधिक होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी मृतांची संख्या वाढू शकते. कारण रुग्णांपर्यंत वेळेत अचूक उपचार पोचतील, असे वाटत नाही. म्हणूनच सुरुवातीच्या काळातच त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आपण सामुदायिक प्रसाराचा मुकाबला करण्यास सक्षम नाहीत. त्यामुळे चाचणीची क्षमता वाढवावी लागणार आहे. सामूहिक प्रसार वाढल्यास चाचणी यंत्रणा अक्षरश: कोलमडून पडेल. त्यामुळे बाधित रुग्ण ओळखून वेळीच त्यांना बाजूला काढणे गरजेचे आहे.
अन्य देशांसारखी आपली स्थिती होऊ नये यासाठी सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. हा संसर्ग इतक्या वेगाने पसरतो की परिसरातील संपूर्ण लोकसंख्येला आपल्या ताब्यात घेतो. या संसर्गाला कोणतेही बंधन नाही. मात्र त्यावर एकच उपाय म्हणजे त्याची साखळी तोडणे. सध्या काही पायाभूत सुविधांचा देखील विचार करायला हवा. त्यात जागतिक सहकार्याचा देखील मुद्दा महत्त्वाचा आहे. करोना व्हायरस नावाच्या महासाथीचा मुकाबला करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण आखणारा एकही जागतिक नेता किंवा संस्था आजघडीला दिसून येत नाही. गेल्या काही महिन्यांत आपण जे काही पाहिले ते स्वार्थ आणि आत्मप्रौढी मिरवण्यासाठी केलेले लाजिरवाणे प्रयत्न आहेत.
करोना व्हायरसने जगातील अनेक शक्तिशाली देशाला लोंटागण घालण्यास भाग पाडले आहे. विशेष म्हणजे एवढे मोठे जागतिक संकट असताना देशा-देशांत परस्पर सहकार्याविषयी कोठेच चर्चा होताना दिसून येत नाही. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो किंवा आपण काय करायला हवे, यावर कोठेच वाच्यता होत नाही किंवा कोणीही बोलायला तयार नाही. एका औषधासाठी अमेरिकेच्या प्रशासनाने भारताला दिलेली धमकी ही कितपत संयुक्तिक होती, हा प्रश्न आहेच.
करोना व्हायरसच्या निमित्ताने सामाजिक आरोग्याचा देखील मुद्दा समोर आला आहे.
आरोग्य यंत्रणा सक्षम नसेल तर आपला संसर्गासमोर निभाव लागणार नाही, हे सिद्ध झाले आहे. अविकसित देश असो किंवा अमेरिकेसारखे बलाढ्य राष्ट्र असो, तेथील खासगी सेवेतील उणिवा जगासमोर आल्या आहेत. याशिवाय देशातंर्गत खासगी आरोग्य यंत्रणा देखील एखाद्या आजाराचा सामना समर्थपणे करू शकत नाही, हे देखील उघड झाले आहे. शहरातील एखाद्या भागात संसर्ग पसरला असेल तर तो भाग लगेच बंद केला जात आहे. त्या भागातून आणखी काही भागात पसरला तर जवळचा सर्व परिसर सिल केला जात आहे. शेवटी आपण किती काळ सीमा बंद करणार आणि संचारबंदी लागू करत राहणार?
अशा प्रकारच्या व्यवस्थेतून संसर्गावर कशी मात करता येईल, हा देखील प्रश्न आहे. यातून तिसरा प्रश्न पडतो, तो म्हणजे करोनानंतर जागतिक वातावरणाचा. आपल्या समाजात आणि व्यवस्थेत असणाऱ्या उणिवांपासून काही शिकणार आहोत काय? भविष्यात जागतिक सहकार्यातून स्थानिक अर्थव्यवस्थेत आणि आरोग्य व्यवस्थेत गुंतवणूक करून ती व्यवस्था मजबूत केली जाणार काय? सध्याच्या कठीण काळात या मुद्द्यावर व्यापक चर्चा करायला हरकत नाही.