सातारा – लॉकडाऊनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा व दुकाने सुरू असल्याने चोरून विकल्या जाणाऱ्या देशी दारू व विदेशी मद्यांचे दर दुपटीहून अधिक झाले आहेत. सिगारेट, गुटखा व तंबाखू यांचीही काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री होत आहे. आता लॉकडाऊनचा कालावधी वाढल्याने तळीरामांची घालमेल वाढली आहे.
लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवेतील लोक वगळता बाकीचे सर्व नागरिक गेले तीन आठवडे घरीच बसून आहेत. दारूचे व्यसन असणाऱ्यांची सुरुवातीचे तीन-चार दिवस चांगलीच घालमेल झाली होती. त्यातच विदेशी मद्याबरोबर देशी दारूचेही दर दुपटीहून अधिक झाले आहेत. हे दर न परवडणारे अनेक तळीराम गपगार पडले आहेत. लॉकडाऊनमध्ये मजुरांपासून अब्जावधींची उलाढाल असलेल्या उद्योजकांपर्यंत सर्वांनाच विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
त्याला तळीरामही अपवाद नाहीत. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्यांनी लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काही दिवसांतच मद्याचा पुरेसा साठा करून ठेवला. मात्र, ज्यांचे हातावर पोट आहे किंवा अर्थप्राप्ती बेताची आहे, अशा तळीरामांची घालमेल वाढली आहे. एखादी तरी बाटली मिळते का, याचा तळीराम युद्धपातळीवर शोध घेत आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूर व कामगार वर्गातील बरेच जण व्यसनाधीन आहेत. मात्र, सद्य स्थितीत “एकच प्याल्या’साठी तळीराम आसुसले आहेत.
काही ठिकाणी चोरटी देशी, विदेशी दारु विक्री होत असली तरी त्याच्या किमती अनेकांच्या खिश्याला न परवडणारे आहेत. सिगारेट, गुटखा, तंबाखू यांचेही दर दुपटी, तिपटीहून अधिक झाल्याने अनेकांना ही व्यसने परवडत नाहीत. त्यामुळे अनेकांनी ही व्यसने तात्पुरती का होईना, सोडली आहेत. त्यातून वाचलेल्या पैशांनी अनेक जण जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात अनेक ठिकाणी दारूची चढ्या दराने चोरटी विक्री होत असली त्याकडे उत्पादन शुल्क विभाग डोळेझाक करत असल्याचे दिसत आहे.
भांडणतंटेही झाले कमी
लॉकडाऊनमुळे अस्वस्थ असलेले अनेक तळीराम व्यसनमुक्तीकडे वळले आहेत. दारुच्या नशेत होणारी भांडणे, तंटे कमी होत असल्याचे चित्र आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.