नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की 1975 मध्ये आणीबाणीच्या काळात भारतातील लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. तथापि लोकांनी लोकशाही मार्गाने हुकुमशाही मानसिकतेचा पराभव केला. मोदींनी मन की बात या रेडिओ प्रसारणात, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील सरकारने लादलेल्या आणीबाणीची आठवण करून दिली आणि त्या काळात जनतेचे सर्व अधिकार कसे हिरावून घेतले गेले याची माहिती दिली.
इंदिरा गांधी पंतप्रधान असताना 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली आणि 21 मार्च 1977 रोजी ती उठवण्यात आली.
मोदी म्हणाले की, आणीबाणीच्या काळात, सर्व अधिकार हिरावून घेतले गेले. या अधिकारांमध्ये राज्यघटनेच्या कलम 21 नुसार जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार होता. त्यावेळी भारतातील लोकशाही, देशातील न्यायालये, प्रत्येक घटनात्मक संस्था यांना चिरडून टाकण्याचे प्रयत्न झाले. देशातील सर्व घटनात्मक कारभार आपल्याच नियंत्रणाखाली ठेवण्याचा प्रयत्न केला गेला असे ते म्हणाले.
ते म्हणाले की त्या काळात सेन्सॉरशिपही इतकी कडक होती की सरकारच्या मंजुरीशिवाय कोणतीही गोष्ट प्रकाशित केली जाऊ शकत नव्हती.मला आठवतं, जेव्हा प्रसिद्ध गायक किशोरकुमारजी यांनी सरकारची स्तुती करण्यास नकार दिला तेव्हा त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती,त्यांची गाणी रेडिओवर वाजवण्याची परवानगी नव्हती असेही मोदींनी यावेळी निदर्शनाला आणून दिले. अनेक प्रयत्न करूनही, हजारो लोकांना अटक करूनही आणि लाखो लोकांवर अत्याचार होऊनही भारतीयांचा लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होऊ शकला नाही, असे ते म्हणाले.
शतकांपासून आपल्यात रुजलेली लोकशाही मूल्ये, आपल्या नसांमध्ये वाहणाऱ्या लोकशाहीच्या भावनेचा अखेर विजय झाला. लोकशाही मार्गाने भारतातील जनतेने आणीबाणीतून सुटका करून लोकशाहीची पुनर्रस्थापना केली, असे ते म्हणाले. हुकूमशाही मानसिकतेला लोकशाही मार्गाने पराभूत करण्याचे असे उदाहरण जगात सापडणे अवघड आहे, असे मोदी म्हणाले. आणीबाणीच्या काळात देशवासियांच्या लढ्याचा साक्षीदार आणि त्यात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले. आज देश स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना, आणीबाणीचा काळोख आपण विसरता कामा नये. भावी पिढ्यांनीही या लढ्याचे स्मरण केले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.