मुंबई : मागच्या चार वर्षांपासून संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालून सर्वांचे मुश्किल केले होते, त्या करोनाचा आता अंत झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आणीबाणीच्या वर्गवारीतून या करोनाला वगळले असल्याची माहिती समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याविषयी,’कोव्हिड-१९ आता सार्वजनिक जागतिक आरोग्य आणीबाणी राहिलेला नाही, असे म्हटले गेले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समितीच्या १५ व्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अद्यनोम गेब्रेयसस यांनी याविषयी माहिती दिली. याविषयी बोलताना, “काल आपत्कालीन समितीची १५ वी बैठक पार पडली. यावेळी, माझ्याकडे शिफारस करण्यात आली की, मी जगभरात कोव्हिड-१९ आता जागतिक आरोग्य आणीबाणी राहिलेली नाही याबाबतची घोषणा करावी. मी त्यांचा सल्ला स्वीकला असून याबाबतची घोषणा करत आहे.” असे त्यांनी म्हटले.
जागतिक आरोग्य संघटनेने, ‘३० जानेवारी २०२० रोजी कोव्हिड-१९ ला त्यांनी जागतिक आणीबाणी जाहीर केलं होतं. ही घोषणा केली तेव्हा चीनमध्ये केवळ १०० करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तोवर करोनामुळे एकही मृत्यू झाला नव्हता. परंतु तीन वर्षांनंतर ही संख्या ७० लाखांच्या पुढे गेली. आमच्या अंदाजानुसार या रोगामुळे आतापर्यंत जगभरात २ कोटींहून अधिक लोकांनी प्राण गमावले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यावेळी डॉ. टेड्रोस यांनी, ‘करोना या रोगाला जागतिक आरोग्य आणीबाणीच्या कक्षेतून वगळलं असलं तरी याचा अर्थ असा नाही की, करोना संपला आहे. गेल्या आठवड्यात करोनामुळे दर तीन मिनिटाला एका व्यक्तीचा जीव जात होता. आताही करोनाबाधित रुग्ण आढळत आहे. तसेच या रोगाचे वेगवेगळे व्हेरिएंट समोर येत आहेत. त्यामुळे आपण सतर्क राहिले पाहिजे.” असेदेखील स्पष्ट केले.