चीन आपली राजकीय उद्दिष्टे प्राप्त करण्याकरता हायब्रीड युद्धाचा वापर करतो आहे. यामध्ये सध्या चीन सॉलोमन बेटांमध्ये लॉ फेअर (कायद्याचा वापर करून युद्ध) चा वापर करून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे.
सध्या जगाचे लक्ष हे युक्रेनच्या युद्धावरती केंद्रित आहे. याचा गैरफायदा घेऊन चीन पॅसिफिक महासागरामधील बेटांवरती आपले अधिपत्य निर्माण करायचा प्रयत्न करत आहे. यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले आहे. चीन सॉलोमन बेटांमध्ये लॉ फेअर (कायदा युद्ध)चा वापर करत आहे. चीन तिथल्या कायद्यांमध्ये बदल करून, असे कायदे तयार करत आहे ज्यामुळे चीनला आपल्या नागरिकांना सॉलोमन बेटांमधील वेगवेगळ्या संस्थांमध्ये घुसखोरी करण्यात मदत मिळेल. एक असा कायदा पास करण्यात येत आहे की, ज्यामुळे चिनी पासपोर्ट होल्डर्सना सॉलोमन बेटांचे नागरिकत्व दिले जाईल. त्यानंतर चिनी नागरिकांना सॉलोमन बेटांच्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये प्रवेश करता येईल. जसे सॉलोमन पोलिसांचे सल्लागार, तेथील नोकरशाही आणि इतर संस्था. ज्यामुळे वेगवेगळ्या संस्थांमध्ये घुसलेले चिनी नागरिक सॉलोमनवरती राज्य करतील. याला हायब्रीड युद्धामध्ये लॉ फेअर किंवा कायद्याचे युद्ध असे म्हटले जाते. यामुळे सात ते आठ लाख लोकसंख्या असलेल्या सॉलोमन बेटांवरती चीनचे पूर्ण नियंत्रण येईल.
पॅसिफिक महासागर चीनचे तळ?
अशाच प्रकारे पॅसिफिक महासागरमध्ये असलेल्या इतर बेटांवर चीन घुसखोरी करत आहे, यामुळे सॉलोमन, इतर पॅसिफिक बेटांवर त्यांचे नियंत्रण होईल. या सगळ्या कारवाईमुळे पॅसिफिक महासागर हे चीनचे तळे बनेल. तेथील नैसर्गिक सामग्री म्हणजे मासे, खनिज, तेल यावरती चीनचे नियंत्रण येईल. ही जगाकरता धोकेदायक परिस्थिती आहे. ऐतिहासिकदृष्ट्या ऑस्ट्रेलिया पॅसिफिकमधील बेटांवरती लक्ष ठेवायचा, परंतु चीनच्या आर्थिक आणि लष्करी ताकद समोर ऑस्ट्रेलियाची ताकद कमी पडत आहे म्हणून आता क्वाड परिषदमधले अमेरिका, जपान आणि इतर देशसुद्धा सामील होऊन चिनी आक्रमणाचा मुकाबला करायचा प्रयत्न करतील.
हायब्रीड युद्ध सुरू
चीनने जगाच्या विरुद्ध “हायब्रीड’ म्हणजे “संकरित युद्ध’ सुरू केले आहे. “हायब्रीड वॉर’ ही एक लष्करी रणनीती आहे, ज्यात पारंपरिक युद्ध हे राजकीय युद्ध, अनियमित युद्ध, सायबर युद्ध आणि मानसिक युद्ध यांचे मिश्रण आहे. “हायब्रिड वॉर फेअर’ मुत्सद्देगिरी, निवडणूक हस्तक्षेप यांसारख्या इतर प्रभावी पद्धतींना एकत्र करते. हा लढा केवळ शस्त्रास्त्रांनी लढला जात नाही, तर त्यात लोकांची विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या युद्धात अफवा, चुकीची माहिती आणि बनावट बातम्या पसरवल्या जातात.
सॉलोमन बेटे हा एक सार्वभौम देश आहे ज्यामध्ये ओशिनियामधील सहा प्रमुख बेटे आणि 900 हून अधिक लहान बेटे आहेत. याचे क्षेत्रफळ 28,400 चौरस किलोमीटर आहे. सोलोमन बेटांवरची लोकसंख्या 6.87 लाख आहे. चीन आशियासह जगातील इतर देशांमध्ये आपले लष्करी सामर्थ्य झपाट्याने वाढवत आहे. नुकतीच प्रशांत महासागरातील सॉलोमन या छोट्या बेटांवरील देशामध्ये चीनच्या लष्करी तळाच्या उभारणीची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यादेशांसह जगाचीही चिंता वाढली आहे.
सॉलोमन बेटांवरून निघणारा ग्वाडल कॅनॉल पॅसिफिक महासागरातून ऑस्ट्रेलियामार्गे न्यूझीलंडला पोहोचतो. यामुळेच अमेरिका आणि ब्रिटनने ऑस्ट्रेलियाला आण्विक पाणबुड्या देण्याची घोषणा केली होती. ऑस्ट्रेलियन मंत्र्यांनी सॉलोमनमध्ये चीनद्वारे चिनी सैन्य पाठवण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
चीन आणि प्रशांत महासागरातील दहा देशांदरम्यान तयार करण्यात आलेल्या ठरावाच्या मसुद्यात प्रशांत महासागरातील हे देश सुरक्षा, पाळत ठेवणे, सायबर सुरक्षा आणि आर्थिक विकासाच्या क्षेत्रात काम करतील, असे म्हटले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री दहा प्रादेशिक देशांच्या दौऱ्यावर होते. त्यांनी किरिबाटी, सामोआ, फिजी, टोंगा, वानुआतु, पापुआ न्यू गिनी आणि पूर्व तिमोर या देशांनाही भेटी दिल्या.
चीनने संपूर्ण नियोजनातून सॉलोमन बेटांवर लष्करी तळ बांधला आहे. आफ्रिकेतील जिबूतीमध्ये चीनचा अधिकृत लष्करी तळ आहे. हे 2017 मध्ये नौदल सुविधा म्हणून बांधले गेले होते. चीन आशिया आणि अमेरिकेतील लष्करी वर्चस्वाला आव्हान देत आहे. सध्या जगातील 90 हून अधिक बंदरे चीनने व्यापली आहेत. ज्यांचा वापर जहाजांच्या निवासासाठी आणि व्यापारासाठी केला जातो, परंतु चीन त्यांचा लष्करी तळ म्हणून वापर करू शकतो.
चीनच्या उदयाला प्रतिबंधित करणे
गंभीर जागतिक परिणाम टाळण्यासाठी पाश्चिमात्य देशांनी चीनच्या उदयाला प्रतिबंधित करणे आवश्यक आहे. चीनचा उदय रोखण्यासाठी, प्रादेशिक गट आणि इतर मदत कार्यक्रम साधने म्हणून वापरले जात आहेत. क्वाड भारताचा निरंतर उदय आणि प्रादेशिक नेतृत्व याला समर्थन देते. एक धोरणात्मक भागीदारी तयार करणे सुरू ठेवून ज्यामध्ये अमेरिका आणि भारत एकत्र काम करतील आणि दक्षिण आशियात स्थिरता वाढवण्यासाठी प्रादेशिक गटांद्वारे; आरोग्य आणि सायबरस्पेस यासारख्या नवीन डोमेनमध्ये सहयोग करतील. आर्थिक आणि तंत्रज्ञान सहकार्य वाढवणे आणि मुक्त इंडो-पॅसिफिकमध्ये योगदान दिले जावे. वास्तविक नियंत्रण रेषेवर जेव्हा चीनचे शत्रुत्व तीव्र असेल तेव्हा अमेरिका संरक्षण भागीदारी वाढवेल आणि भारताला पाठिंबा देईल, अशी अपेक्षा आहे.
हिंदी महासागरात भारताचा तळ गरजेचा
भारताने चीनकडून दाबल्या गेलेल्या देशांना चीनच्या प्रभावातून मुक्त करण्याचे धोरण राबविले. नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांना चीनच्या धोक्याची जाणीव झालेली आहे. भारताकडे अंदमान हेही असेच अत्यंत सामरिक महत्त्व असलेले बेट आहे. भारताकडूनही हिंदी महासागरात अंदमान आणि लक्षद्वीप या भारताचाच भाग असलेल्या बेटांवरील पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे. तसेच हिंदी महासागरामधील मॉरिशसच्या अगलेगा बेटांवर भारतातर्फे पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे. मॉरिशसकडून भारताला या बेटांवर पायाभूत सुविधा उभारण्यास संमती मिळालेली आहे. या बेटांचे मोठे सामरिक महत्त्व आहे. भारताला हिंदी महासागरात आपला स्वतःचा तळ असणे, अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताने मोठी मालवाहू विमाने उतरविण्यासाठी अगलेगा येथे मोठी धावपट्टी उभी केली आहे. नैसर्गिक संपत्ती आणि साधने स्वस्तात मिळवण्याकरता भारतानेसुद्धा या बेटांमध्ये प्रयत्न करायला पाहिजे.