पाटणा आणि रायपूर येथे तीन बसेस पाठवणार
पुणे – ‘लॉकडाऊन’मुळे गावी परतलेल्या कामगारांना परत कामावर आणण्यासाठी “महामेट्रो’ने आटापिटा सुरू केला आहे. त्याचाच एक प्रयत्न म्हणून त्यांनी रायपूर आणि पाटणा येथे तीन बस पाठवल्या आहेत. मेट्रोच्या कामावरील सध्या 200 कामगार कामावर रुजू झाले आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोच्या 2,800 पैकी 2,000 कामगारांनी घरे जाणे पसंत केले होते. त्यामुळे सुमारे 800 कामगारच येथे राहिले होते. त्याचा परिणाम मेट्रोच्या कामावर झाला आणि प्रकल्पाची गती कमी झाली. तर, रेल्वे आणि बससेवा सुरू नसल्याने महामेट्रोने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि अन्य राज्यांतील जिल्हा प्रशासनांना पत्र लिहून मजुरांना परत आणण्याची व्यवस्था करण्यासंबंधी विनंती करणारे पत्र लिहिले होते. मात्र, त्याला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महामेट्रोने स्वत: बस भाड्याने घेऊन पाटणा आणि रायपूर येथे तीन बसेस पाठवल्या आहेत.
महामेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मेट्रो मार्गांवर काम करण्यासाठी महिन्यापूर्वी अवघे 880 कामगार होते. मात्र, महिनाभरात 200 कामगार परतले आहेत. मेट्रोचे काम वेगात होण्यासाठी ही संख्यादेखील अपुरी असून, मनुष्यबळाची कमतरता पूर्ण करण्यासाठी “महामेट्रो’ विशेष प्रयत्न करण्यात येत आहे.
– हेमंत सोनवणे, महाव्यवस्थापक, महामेट्रो.