मुंबई – राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना टार्गेट केले आहे. परमवीर सिंग यांची वक्तव्ये राजकारणाने प्रेरित असून अँटिलिया बॉम्ब प्लांटचा मुख्य सुत्रधार तेच आहेत, असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. सिंग यांच्या माध्यमातून खोटे आरोप करण्यात येत आहे.
केंद्रसरकार परमवीरसिंग यांच्या माध्यमातून आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी व अडचणीत आणण्यासाठी कटकारस्थान रचत आहे. त्यांचे हे कटकारस्थान कोर्टात उघड होईल, असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. यावेळी मलिक यांनी अँटालिया प्रकरणी अनेक गंभीर आरोप केले आहे. सिंग यांचा या प्रकरणात काय सहभाग होता, त्यावेळी पोलीस तपासात काय उघड होणार होतं आणि एनआयए आल्यानंतर या तपासावर काय परिणाम झाला यावर मलिक यांनी प्रकाश टाकला आहे.
अँटिलिया बॉम्ब प्लांटनंतर मनसुख हिरेनची हत्या करण्यात आली. एटीएस या प्रकरणाचा तपास करत असताना अजून सत्य बाहेर येणार होते. त्याचवेळी एनआयएने तपास हाती घेतला. त्याचवेळी परमवीर सिंग यांच्या घरी बैठक झाली याचा उल्लेख आहे. कुरकुरे बालाजी यांच्या ईमेलचा उल्लेख आहे. इलेक्ट्रॉनिक पुरावे तयार करण्यासाठी 5 लाख रुपये देण्यात आले याचाही उल्लेख आहे, असे असताना ऍडिशनल चार्जशीट दाखल करणार असल्याचे सांगूनही एनआयएने चार्जशीट दाखल केली नाही याचा अर्थ केंद्रसरकार परमवीर सिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.