नागपूर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लिहिलेले पत्र नवाब मलिकांबद्दलचे आहे. भाजपच्या एवढ्या भावना तीव्र असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करतो. त्याचा आदर करतो. जे पत्र लिहिले त्या पत्राचे उत्तर कधी मिळणार हे सुद्धा आम्हाला माहिती नाही. पण ज्या न्यायाने नवाब मालिकांना त्यांनी सांगितले की यांना दूर ठेवा. पण तोच न्याय दुसऱ्यांना लावणार आहात का? कारण एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय हे लोकांना पटेल काय? असे म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्र प्रपंचाचा समाचार घेतला.
हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील पहिल्या दिवशी सोमवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह माजी मंत्री आदित्य ठाकरेंची उपस्थिती लावली. विधान परिषदेच्या दुपारच्या सत्रापर्यंत कामकाजानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पाठवलेल्या पत्रावर भाष्य करत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांवर मागील एक ते दीड वर्षांमध्ये अवकाळी, गारपीटी असे अनेक संकट कोसळली. याबाबतीत सरकार काय करते हेच कळत नाही. तर विमा कंपन्यांनी त्यांचे दरवाजे, खिडक्या बंद करून ठेवल्या आहेत. तर राज्य सरकारने घोषित केलेली अग्रीम रक्कम किती शेतकऱ्यांना मिळालेली आहे याचाही काही अंदाज नाही, असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीसह कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवले.
सध्या पत्रांचा जमाना आहे. आम्हीसुद्धा काही दिवसांपूर्वी निवडणूक विभागाला पत्र दिले होते. त्याचे उत्तर आले नाही. धर्माच्या नावावर, देवाच्या नावावर मतं मागायला परवानगी जर असेल तर आम्ही सुद्धा सुरू करतो असे म्हणत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेशात केलेल्या घोषणेचा पुन्हा एकदा समाचार घेतला.