सातारा – कृषी सुधारणा विधेयक म्हणजे मोदी सरकारचे ऐतिहासिक पाऊल आहे. कॉंग्रेसने देशातील शेतकऱ्यांच्या हिताला जपणारा कोणताही निर्णय घेतला नाही आणि आज जेव्हा मोदी सरकार शेतीविषयी कायद्यामध्ये सुधारणा करून कृषी क्षेत्रामध्ये बदल घडवून आणून बळीराजाची परिस्थिती सुधारण्यासाठी कार्यरत असताना शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कॉंग्रेस करीत आहे, असा दावा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी पत्रकाद्वारे केला.
राहुल गांधी यांनी 2013 मध्ये कॉंग्रेसचे शासन असणाऱ्या बारा राज्यांमध्ये फळे व भाज्या एपीएमसी अधिनियमामध्ये समाविष्ट करून घेऊ नये असे सांगितले होते आणि तीच कॉंग्रेस आज एपीएमसी अधिनियमामध्ये केल्या जाणाऱ्या बदलाला विरोध करीत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्ष शेतकऱ्यांना भडकवण्याचे काम करत आहेत, देशातील हमी भावाची व्यवस्था पहिल्याप्रमाणेच सुरू राहील आणि काही धान्यांची आधारभूत किंमत वाढवण्यात आली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे तरीही विरोधी पक्ष राजकारण करत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
या बदलांमुळे कृषी उत्पन्न बाजार समितीने मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही मालाची खरेदी- विक्री करता येईल, कृषीमालाच्या राज्यांतर्गत आणि आंतरराज्य हालचालीतील अडथळे दूर होण्यास मदत होईल, मार्केटिंग आणि वाहतूक खर्च कमी करून शेतकऱ्यांना अधिक चांगली किंमत मिळेल, इ- ट्रेडिंगसाठी व्यवस्था उपलब्ध होईल, किमती स्थिर राहण्यात मदत होऊन ग्राहक व शेतकरी दोघांचाही फायदा होईल, असे त्यांनी नमूद केले आहे. कृषी सुधार विधेयके मंजूर झाल्यामुळे शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी अनेक संधी उपलब्ध झाल्यामुळे त्यांचा नफा वाढेल.
आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल, शेतकरी सशक्त होतील, आधारभूत किंमत आणि शासनातर्फे खरेदीची व्यवस्था सुरूच राहणार आहे, या विधेयकामुळे शेतकऱ्यांना शेतमालाचा साठा करणे आणि विक्री करण्यासाठी स्वातत्र्य मिळेल आणि दलाल आणि मध्यस्थ यांच्या जोखडातून शेतकऱ्यांची सुटका होईल, असा दावा त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी मोदी सरकार कटिबद्ध असून या एनडीए सरकारच्या कालावधीत शेतीमालाच्या आधारभूत किमतीमध्ये भरीव वाढ केली गेली आहे.
“यूपीए’च्या काळात मसूर डाळीचे हमीभाव 2950 रुपये होते, ते आता 5100 रुपये झाले. याचप्रमाणे उडीद हमीभाव 4300 वरून वाढून 6000 रुपये झाले आहेत. याचप्रमाणे मूग, हरभरा आणि मोहरी यांच्यासुद्धा हमीभावामध्ये भरीव वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.