पुणे – कोथरुड पोलिसांनी अटक केलेल्या इम्रान खान व मोहंमद साकी यांच्या तपासासाठी तीन राज्यांतील दहशतवाद विरोधी पथके पुण्यात दाखल झाली आहेत. तसेच आयबी आणि एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांचीही पथकेही ठाण मांडून आहेत. हे दोघे दहशतवादी महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात आहेत. या दोघांचा फरार साथीदार मोहंमद आलमचे ‘दिल्ली कनेक्शन’ सापडले आहे.
पकडण्यात आलेले दोन दहशतवादी मोहंमद शाहनवाज शफीउर रहमान आलमसोबत मागील दीड वर्षांपासून कोंढवा परिसरात मिठानगर येथे वास्तव्यास होते. यादरम्यान ग्राफिक्स डिझायनिंग कामाच्या बहाण्याने ते कार्यरत होते. त्यांच्या तपासात आलमची भूमिका महत्त्वाची असल्याचे उघड झाले. तसेच ते तिघेही दहशतवादी कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांच्याकडे सापडलेल्या ड्रोन, रासायनिक आणि इतर साहित्यांवरुन स्पष्ट झाले. यामुळे देशभरातील तपास यंत्रणांनी पुण्यात धाव घेतली.
हे दोघेही मध्य प्रदेशचे रहाणारे असल्याने मध्य प्रदेशचे एटीएसचे पथक पुण्यात आले आहे. तर ते राजस्थान येथील साखळी बॉम्बस्फोट कटातील वॉंटेड असल्याने राजस्थान एटीएसचे पथकही दाखल झाले आहे. एनएआएने राजस्थान साखळी बॉम्बस्फोट कटात त्यांना वॉंटेड घोषित केल्याने त्यांचे पथकही ठाण मांडून आहे. तसेच आयबीचे पथकही इतर पथकांना तपासात मदत करत आहे.
- आयबी आणि एनआयए संस्थांची पथकेही ठाण मांडून
- ‘त्यां’ची कोंढव्यात आणखी एक सदनिका भाड्याने
एटीएसच्या अधीक्षकांकडून दोनदा हाऊस सर्च
महाराष्ट्र एटीएसचे अधीक्षक पुण्यात ठाण मांडून आहेत. दहशतवादी राहत असलेल्या सदनिकांची त्यांनी सलग दोन दिवस तपासणी केली. सोमवारी त्यांना सदनिकेवर नेऊन रात्री उशिरापर्यंत तपासणी करण्यात येत होती. त्यांच्या घरमालकांनाही तपासणीसाठी बोलवण्यात आले होते. दोघेही दहशतवादी मोठ्या कटाचा भाग असल्याने आयपीएस दर्जाचे अधिकारीच प्रत्यक्षात त्यांची चौकशी करत आहेत.
स्पेशल सेलचे पथक दाखल
आजवरच्या प्राथमिक तपासात मोहंमद शाहनवाज शफीउर रहमान आलम हा कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले. मात्र, त्याचे आजवर कोणतेही रेकॉर्ड सापडले नाही. तो मूळचा दिल्लीचा असल्याने तेथील स्पेशल सेलची पथके त्याची माहिती घेण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. फरार आरोपी आलमच्या मागावर पुणे पोलीस होते. त्याचे लोकेशन वसईपर्यंत सापडले होते. यानंतर तपास आता एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. एटीएसचे पथक त्याचा माग काढत आहे. तो सापडल्यास स्लीपर सेल आणि त्यांच्या कारवायांचा उलगडा होऊ शकतो. दरम्यान, या तिघांनी कोंढवा परिसरात आणखी एक सदनिका भाड्याने घेतल्याचे उघड झाले आहे.