पुणे – महाराष्ट्रात सध्या पक्ष आणि गटांची राजकीय स्थिती अभूतपूर्व अशी झाली आहे. गटागटांची महायुती आणि महाआघाडीत मैत्रीपूर्ण वातावरण राहिले तर आगामी 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांत जागा वाटपाचा तिढा पाहायला मिळणार आहे. यातून सत्तेसाठी एकत्र आलेल्या या आघाड्या पुन्हा फुटूही शकतील. लोकसभेच्या 48 आणि विधानसभेच्या 288 जागांसाठीचे जागा वाटपाचे गणित या पक्षीय आघाड्या कसे सोडवणार? याचे ठाम उत्तर आज सत्तेत सहभागी कोणत्याही राजकीय पक्षाकडे सध्यातरी नाही.
राज्यातील सत्तेसाठी राजकीय आघाड्यांची झालेली ही जुळवणी 2024 पर्यंतच्या निवडणुकांपर्यंत अशीच राहिली तर जागा वाटपाचा गुंता वाढणार का? की हाच मुद्दा महाआघाडी, महायुती तुटण्यास कारणीभूत ठरणार? असे प्रश्न येत्या काही काळातच उपस्थित होऊन प्रत्येक महायुती आणि महाआघाडीसमोर नवा जागवाटपाचा “फॉर्म्युला’ तयार करण्याचे आव्हान असणार आहे.
भाजपच्या आघाडीत सगळ्या पक्षांनी समान जागा विधानसभेला लढवायच्या ठरविल्या तर प्रत्येकाला 90च्या आसपास जागा येतील. परंतु, विधानसभा 2019च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने 164 लढवित 105 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे 105 आमदार असलेला भाजप 2024च्या निवडणुकीसाठी इतक्या कमी जागा लढवणार का? याशिवाय 2024 मध्ये भाजपने स्वतः152 आमदार निवडून आणण्याचे टार्गेट ठेवले आहे.
तर, शिवसेनेने 124 जागांपैकी 56 जागेवर आमदार 2019 मध्ये निवडून आले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे गट नेमक्या किती जागा मागणार तसेच राष्ट्रवादीने 54 आमदार असताना 2024च्या निवडणुकीसाठी अजित पवार गटाला 90 जागा दिल्या जाणार का? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सत्तेसाठी या गटांची-भाजपची महायुती असली तरी भाजप समाविष्ट पक्षांसाठी किती जागा सोडणार याबाबत अखेरपर्यंत अनिश्चीतता राहणार आहे.
…या पक्षांच्या जागांचे काय?
एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महायुतीत गेले आहेत, तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत आहे. दोन पक्षांचे चार गट झालेले असताना राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी, राज्याच्या काही भागात प्रभाव असलेली एमआयएम तसेच एक-दोन जागा हमखास जिंकणारे छोटेमोठे पक्ष त्या-त्या ठिकाणी महत्त्व राखून आहेत. त्यातील काही सत्तेत सहभागी आहेत तर काही बाहेर आहेत, त्यामुळे त्यांच्या जागांचाही विचार जागा वाटापा वेळी करावा लागणार आहे. यावरून जागावाटपाचा गुंता सुटण्याऐवजी अधिक वाढू शकतो.
राष्ट्रवादीचे गट स्वबळावर सत्ता आणणार?
शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या महायुतीत सहभागी झाल्यानंतर आगामी 2024च्या विधानसभा निवडणुकीत 90 जागा लढविण्यासाठी मिळणार असल्याचा दावा अजित पवार गटाकडून केला जात आहे. याचा अर्थ संपूर्ण राष्ट्रवादी कॉंग्रेस आपल्याच बाजुने असल्याचे अप्रत्यक्षरित्या अजित पवार यांच्याकडून सांगितले जात आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीपेक्षा कमी जागा लढविण्यासाठी पवारांचा गट तयार होणार नाही. कारण, राष्ट्रवादीतून बाहेर पडताना शरद पवार यांच्यावर टीका करताना इतक्या वर्षानंतरही आपण स्वबळावर सरकार स्थापन करू शकलो नाही? तसे आपले स्वप्न असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. मग, ते बहुमतावर स्वतःच्या पक्षाचे सरकार आणण्यासाठी कमी जागा कशा लढवतील.