नवी दिल्ली – माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचे आणि संघाच्या काही नेत्यांचे चांगले संबंध होते. एवढेच नव्हे तर संघाचे नेते इंदिरा गांधींच्या मदतीला धावून गेले होते. इंदिरा गांधींनीही संघाचा उपयोग आपल्या फायद्यासाठी करून घेतला होता. मात्र, त्यांनी स्वतःला संघापासून दूरच ठेवण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा पत्रकार नीरजा चौधरी यांनी लिहिलेल्या एका पुस्तकामध्ये करण्यात आला आहे.
“हाऊ प्राईम मिनिस्टर्स डिसाईड’ या पुस्तकामध्ये नीरजा चौधरी यांनी पंतप्रधानांच्या कार्यकौशल्याचे विश्लेषण केले आहे. या विश्लेषणासाठी त्यांनी सहा निर्णयांचे ऐतिहासिक संदर्भ तपासले आहेत. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी नंतर 1980 मध्ये सत्तेत परत येण्यासाठी वापरलेली रणनीती, शाह बानो प्रकरण, मंडल आयोग, बाबरी मशीद प्रकरण, आण्विक चाचण्यांबाबत अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका आणि मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातील भारत-अमेरिका दरम्यानच्या अणुकराराच्यावेळचे ऐतिहासिक संदर्भांचा आढावा घेतला आहे.
आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इंदिरा गांधींशी विचारविमर्श केला होता. संघाचे तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी त्यांना अनेक पत्रेही पाठवली होती. संघाच्या काही नेत्यांनी कपिल मोहन यांच्या माध्यमातून संजय गांधी यांच्याशीही संपर्क साधला होता. मात्र, इंदिरा गांधींनी या संवादाला खूपच काळजीपूर्वकपणे प्रतिसाद दिला होता, असे चौधरी यांनी म्हटले आहे.
इंदिरा गांधींनीही आणीबाणीला पाठिंबा मिळवण्यासाठी संघाचा वापर खुबीने करून घेतला. मुस्लिमांमध्ये कॉंग्रेसबद्दलची नाराजी लक्षात घेऊन त्यांना आपल्या राजकारणाचे हिंदूकरण करायचे होते. यासाठी संघाने त्यांच्याबद्दल तटस्थ राहणे त्यांच्यासाठी फायद्याचे असेल याची त्यांना कल्पना होती. त्याचवेळी 1980 च्या सुमारास अटलबिहारी वाजपेयी सर्वधर्मसमभावाची प्रतिमा निर्माण करायला लागले होते, 1980 मध्ये सत्तेत परतण्यासाठी संघानेच इंदिरा गांधींना मदत केली, असे गांधींचे निकटवर्तीय अनिल बाली यांच्या हवाल्याने चौधरींनी म्हटले आहे.
संघाने आपल्याला मदत केली आहे, हे इंदिरा गांधींना माहिती होते. संघाच्या मदतीशिवाय 353 जागा जिंकणे त्यांना शक्यच नव्हते, याची त्यांना कल्पना होती. पण त्यांनी ते कधीही उघडपणे मान्य केले नाही. बाळासाहेब देवरसांनीही एकदा “इंदिरा गांधी हिंदुत्ववादी आहेत.’ असे म्हटले होते. बांगलादेशच्या निर्मितीसाठीही संघाने इंदिरा गांधींचे कौतुक केले होते. गोळवलकर गुरुजींनीही अणुचाचणीच्या निर्णयावरून त्यांचे कौतुक केले होते.