मुंबई – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. लोकसभेच्या विजयानंतर धुंदीत असलेल्या भाजप-सेनेने आता जमिनीवर उतरावे. हवा बदलतेय, सर्वसामान्य जनतेचा कौल बदलतोय. विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडीचाच विजय होणार. राज्यात परिवर्तन होणार, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. मूल नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेस उमेदवार ललिता फुलझेले यांनी भाजप उमेदवार शिल्पा रामटेके यांचा 176 मतांनी पराभव केला आहे.
तसेच कोल्हापूर महापालिका पोटनिवडणुकीतसुध्दा दोन्ही जागा आघाडीने जिंकल्या आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सिद्धार्थनगर आणि पद्दाराजे या प्रभागात झालेल्या निवडणुकीत कॉग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे. सिद्धरार्थनगर प्रभागात कॉग्रेसचे जय पटकारे तर पद्माराजे प्रभागात राष्ट्रवादीचे उमेदवार अजित राऊत यांनी विजय मिळविला आहे.