मनिला – आशिया खंडातील 1080 च्या दशकातील सर्वात वेगवान धावपटू अशी ख्याती मिळवलेल्या लिडीया डी वेगा यांचे निधन झाले. भारताची अव्वल महिला धावपटू पायोली एक्सप्रेस पी. टी. उषा हिला शंभर मीटरच्या शर्यतात कायम मागे टाकणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून लिडीया नावाजल्या गेल्या होत्या. त्या 57 वर्षांच्या होत्या.
1980 सालच्या दशकात त्या आशियातील सर्वात वेगवान महिला धावपटू ठरल्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून त्या कर्करोगाने आजारी होत्या. त्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत तब्बल 15 स्पर्धा जिंकत सुवर्णपदकांना गवसणी घातली होती. त्या काळात शंभर मीटरच्या शर्यतीत त्यांचीच मक्तेदारी होती.
1987 साली झालेल्या 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावताना 11.28 सेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवली होती. 1982 साली भारतात तर 1986 साली सेऊलला झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये त्यांनी 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळवले होते. भारताची अव्वल धावपटू पी. टी. उषा यांच्यावर लिडीया यांनी कायम वर्चस्व गाजवले. त्यावेळी उषा अफलातून कामगिरी करत होत्या मात्र, लिडीयासमोर त्यांना सातत्याने अपयशच येत होते.
उषा यांची लिडीया यांच्याशी होत असलेली चुरस त्या काळी कायमच चर्चेत होती. त्या काळी 200, 400 मीटर धावण्याची तसेच 400 मीटर अडथळा शर्यतीत उषाला पराभूत करणे कोणालाही जमले नव्हते. मात्र, 100 मीटर शर्यतीत लिडीया यांनी कायमच उषा यांच्यावर वर्चस्व गाजवले होते. त्यांच्या निधनावर उषा यांनीही शोक व्यक्त केला असून सर्वात मोठ्या मनाची स्पर्धेक व एक चांगली मैत्रीण गमावल्याचे दुःखही उषा यांनी व्यक्त केले.