कोलंबो :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताकडून पराभूत झालेले दोन्ही संघ पाकिस्तान व श्रीलंका यांच्यासाठी आज(दुपारी ३ वाजता) याच संघात होत असलेला सामना अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल व रविवारी त्यांचा विजेतेपदासाठी भारताशी सामना होणार आहे.
सुपर फोर गटात भारतीय संघाने पाकिस्तान व श्रीलंका या दोन्ही संघांना पराभूत करत थाटात अंतिम फेरी गाठली आहे. दुसरीकडे पाकिस्तान व श्रीलंका या दोन्ही संघांनी बांगलादेशचा पराभव केल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपूष्टात आले आहे. आता आज होत असलेल्या पाकिस्तान व श्रीलंका या सामन्याला जणू उपांत्य फेरीचेच स्वरुप आले आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे.
श्रीलंका संघाने सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला होता. पाकिस्तान संघानेही पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव केला आणि नंतर या दोन्ही संघांना भारतीय संघाकडून पराभव पत्करावा लागला.
सुपरफोरमधील गुणतालिका पाहिल्यास भारतीय संघाने दोन्ही सामने जिंकताना चार गुण मिळवले असून त्यांचा नेट रन रेट 2.690 आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान प्रत्येकी एक विजय आणि एका पराभवानंतर प्रत्येकी 2 गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. श्रीलंकेचा नेट रन रेट -0.2 आहे. तर पाकिस्तानचा नेट रन रेट -1.892 आहे.
अंतिम फेरीत दाखल झालेले असूनही भारतीय संघाला सुपर फोरमधील अखेरचा सामना शुक्रवारी बांगलादेशशी खेळायचा आहे. अर्थात या सामन्यातील निकालाचा स्पर्धेवर कोणताही परिणाम होणार नसल्याने भारतीय संघासाठी हा सामना केवळ एक औपचारिकताच राहणार आहे.
पाकची डोकेदुखी वाढली…
हॅरिस रौफ व नसीम शाह दुखापतीमुळे जायबंदी ठरल्यामुळे पाकिस्तान संघाची डोकेदुखी वाढली आहे. श्रीलंकेला पराभूत करत अंतिम फेरीत स्थान मिळवायचे असेल तर त्यांना कर्णधार बाबर आझम, इफ्तेखार अहमद, महंमद रिझवान या दीग्गज फलंदाजांच्या तर गोलंदाजीत शाहीन शाह आफ्रीदी याच्या गोलंदाजीवरच अवलंबून राहावे लागणार आहे. त्यातही त्यांचा कर्णधार आझम या सामन्यात कशी खेळी करतो यावरच त्याचा विजय व पराजय निश्चित होणार आहे.