नवी दिल्ली :- आशिया करंडक स्पर्धेत रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात महंमद शमीला स्थान देण्यात न आल्यामुळे भारताचा माजी कसोटीपटू हरभजन सिंग याने टीका केली आहे. श्रीलंकेतील सध्याच्या पावसाळी वातावरणात शमीच्या स्विंग गोलंदाजीमुळे मोठा लाभ झाला असता, असेही हरभजन म्हणाला.
जसप्रीत बुमराहने संघात पुनरागमन केले आहे तर महंमद सिराजच्या जागी किंवा शार्दुल ठाकूरच्या जागी शमीला संघात स्थान द्यायला हवे होते. श्रीलंकेत सध्या परतीचा पाऊस सुरु आहे. त्यामुळे वातावरणात थोडासा गारवाही आहे. या वातावरणात शमीची गोलंदाजी खेळणे पाकिस्तानसह सगळ्याच संघांसाठी त्रासदायक ठरेल. शमीकडे वेग आहे, बाऊन्स तर आहेच पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे तो चेंडू दोन्ही बाजूने स्विंग करु शकतो तसेच रिव्हर्स स्विंगही करु शकतो. असा गोलंदाज अंतिम संघात स्थान मिळवू शकत नाही याचे नवल वाटते, असेही हरभजन म्हणाला.
नेपाळविरुद्धच्या सामन्यात शमी अपयशी ठरला म्हणून पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून त्याला वगळले असे कारण सांगणे हास्यास्पद आहे. शमीची पाकिस्तानविरुद्धची कामगिरी अफलातून राहीली आहे. त्याने पाकिस्तानच्या पहिल्या चारही फलंदाजांना त्रस्त केले असते अशीच खेळपट्टी पाहून वाटते, असेही त्याने म्हटले आहे.
जर संघात नवोदित व वरिष्ठ असा समतोल राखायचा होता, तर ठाकूर हा अष्टपैलू खेळाडू कसा म्हटला जात आहे. पहिले पाच फलंदाज दीग्गज असताना तसेच ते सातत्याने धावा करत असतानाही ठाकूरवर जास्त विश्वास कसा दाखवला गेला. संघात तीन गोलंदाज निवडायचे होते तर ठाकूरच्या जागी शमीलाच स्थान द्यायला हवे होते. त्याची गोलंदाजी या सामन्यात निर्णायक ठरली असती.
ठाकूर फलंदाजी व गोलंदाजी करु शकतो हे मलाही मान्य आहे परंतू कोणत्या संघाविरुद्ध कोणाला संधी द्यायची हे कर्णधाराला ठरवता आले पाहीजे. रोहितने शमीला वगळून चुक केली असेच मी म्हणेन, असेही हरभजन म्हणाला.