कोलंबो :- “आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान संघाविरुद्ध फारसे क्रिकेट न खेळल्यामुळे शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफसारख्या वेगवान गोलंदाजांचा सामना करणे आव्हानात्मक आहे,’ असे मत भारताचा सलामीवीर शुभमन गिल याने मांडले आहे. रविवारी(दि.१०)भारताचा पाकिस्तानविरुद्ध सुपर 4 टप्प्यातील सामना होत असून त्या पार्श्वभूमिवर आयोजित पत्रकार परिषदेत गिल बोलत होता.
यापूर्वी झालेल्या सामन्यात आत येणाऱ्या चेंडूवर खेळताना भारताचे अव्वल फलंदाज संघर्ष करताना दिसले होते. त्याबद्दल गिल पुढे म्हणाला, “आम्ही इतर संघाविरुद्ध जितके सामने खेळतो तितके पाकिस्तानविरुद्ध खेळत नाही. आपल्या सर्वांना माहित आहे की पाकिस्तानचे गोलंदाजी आक्रमण खूप चांगले आहे आणि जेव्हा आपण अशा गोलंदाजीविरुद्ध खेळत नाही तेव्हा मोठ्या स्पर्धांमध्ये थोडा फरक पडतो.भारत आणि पाकिस्तानचे संघ केवळ विश्वकरंडक आणि आशिया करंडक यांसारख्या स्पर्धांमध्ये एकमेकांसमोर येतात,’ असेही त्याने पुढे म्हटले.
शाहीनच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजी तज्ञ नुवान सेनेविरत्ने सोबत सराव केल्याचा फायदा होत असल्याचेही त्याने यावेळी सांगितले. तो म्हणाला, नुवान गेली सात-आठ वर्षे आमच्यासोबत आहे. विविधता असणे चांगले आहे. आमच्याकडे उजव्या हाताचे विशेषज्ञ रघू, दयानंद गरानी आणि डाव्या हाताचे विशेषज्ञ आहेत. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत खेळताना त्यांची निश्चितच मदत होते. परंतू, पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज खूप वेगळे आहेत.
त्यांची स्वतःची खासियत आहे. शाहीन चेंडू खूप स्विंग करतो. नसीम शाह वेगावर लक्ष केंद्रित करतो आणि त्याला विकेटची मदत आवडते. ते वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारे मारा करून आव्हाने तयार करतात, असेही गिलने यावेळी म्हटले.
सुरुवातीला वर्चस्व गाजवावे लागणार..
ओपनिंग बॅट्समन म्हणून आम्हांला चांगली सुरुवात करून सुरुवातीपासूनच वर्चस्व राखण्याची गरज आहे. रोहितसोबतची भागीदारी महत्त्वाची असल्याचे सांगताना तो म्हणाला, रोहित असा खेळाडू आहे की त्याला गोलंदाजांना हवेत अधिक खेळणे आवडते आणि मला पॉवर प्लेमध्ये ग्राउंड शॉट्स खेळायला आवडतात. हे संयोजन आमच्यासाठी चांगले कार्य करते. शॉट सिलेक्शन आणि परिस्थिती हाताळण्याच्या बाबतीत आम्ही वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतो. त्यामुळे विरोधी संघाला आम्हाला रोखणे थोडे अवघड जाते, असेही गिलने पुढे बोलताना म्हटले.
तसेच, “वरिष्ठ स्तरावर पाकिस्तानविरुद्धचा हा माझा पहिला सामना होता. तो एक वेगळ्या प्रकारचा दबाव होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाविरुद्ध पहिल्यांदा खेळताना दबाव नेहमीच असतोच,’ असेही त्याने म्हटले.