कोलंबो :- भारत व पाकिस्तान यांच्यात रविवारी झालेल्या सामन्याकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. आशिया करंडक स्पर्धेचे संयुक्त यजमान असलेल्या श्रीलंकेतील कोलंबोमधील मैदानावर हा सामना होता व त्यात व्हीआयपी कक्ष वगळता जवळपास सगळ्या खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या.
खरेतर भारत व पाकिस्तान यांच्यात जगाच्या कोणत्याही ठीकाणी सामना खेळवला गेला तर त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो. सामन्यांची तिकिटेही काही क्षणात विकली जातात मात्र, या स्पर्धेत चित्र निराळेच दिसून आले. एकतर पावसाच्या व्यत्ययामुळे साखळीतील या दोन संघातील लढत केवळ भारताच्या फलंदाजीनंतर होऊ शकली नाही. आता रविवारी सुपर फोर गटाच्या सामन्यातही पावसाने खोडा घातला होता. मात्र, वेळेवर सामना सुरु होऊनही अनेक स्टॅण्ड रिकामेच होते. हे चित्र सकारात्मक निश्चितच नव्हते.
सामन्यासाठी ठेवण्यात आलेली तिकिटांची किंमतही अफाट असल्यामुळेही त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे आता बोलले जात आहे. जवळपास 6 हजार रुपयांचे तिकीट या दोन संघातील लढतीसाठी ठेवले गेले होते. अन्य सामन्यांची तिकिटे 1500 रुपयांपासून होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सातत्याने सामने खेळवले गेले तरच प्रेक्षक स्टेडियमकडे येतील. त्यातही सामन्यासाठी आता श्रीलंकेत जे वातावरण मिळाले ते देखील प्रेक्षकांचा उत्साह वाढवणारे नव्हते. सामना पुर्ण होणार का, रद्द तर होणार नाही अशा शंका सगळ्यांच्याच मनात होत्या. भारतात यंदा होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेतील भारताच्या सामन्यांची सर्व तिकिटे काही क्षणात विकली गेली. त्यातही भारत व पाकिस्तान यांच्यातील सामन्याची तिकिटे तर विक्री सुरु झाल्यावर तासाभरातच विकली गेली. त्यामुळे आशिया करंडक स्पर्धेतील चित्र निराशाजनक ठरत आहे.
श्रीलंकेत काही दिवसांपूर्वी महागाईने उच्चांक गाठला होता, त्यातून सामान्य नागरीक अद्याप बाहेर आलेले नसताना हे सामने ठेवले गेल्याने आपला खिसा तिकिटांसाठी रिकामा करण्याची तयारी सर्वसामान्य व्यक्तींनी दाखवली नाही ही देखील वस्तूस्थिती नाकारता येणार नाही.