कोलंबो :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज (शुक्रवार) भारत व बांगलादेश यांच्यात सुपर फोर गटातील अखेरची साखळी लढत होत आहे. भारतासाठी या सामन्यातून कमावण्यासारखे काही नसून बांगलादेशसाठी सामना गमावण्यापेक्षा किमान प्रतिष्ठा राखणे हेच उद्दिष्ट राहणार आहे. आता या लढतीद्वारे भारतीय संघात काही प्रयोग केले जाणार का हेच पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भारत विरुद्ध बांगलादेश
वेळ – दुपारी 3 वाजल्यापासून
ठिकाण – कोलंबो
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस
या स्पर्धेत भारताने यापूर्वीच अंतिम फेरी गाठली असून सलग दोन पराभवांमुळे बांगलादेशचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. सुपर फोर गटात भारतीय संघाने पहिल्यांदा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला तर त्यानंतर झालेल्या लढतीत श्रीलंकेवर मात करत अंतिम फेरीत स्थान मिळवले.
आता या सामन्याबाबत बोलायचे तर बांगलादेशचा संघ खेळाडूंच्या दुखापतींनी त्रस्त आहे. त्यातच त्यांचा कर्णधार शकीब अल हसन वगळता अन्य फलंदाजांनी संपूर्ण स्पर्धेत साफ निराशा केली आहे. प्रमुख फलंदाज लिंटन दासही फारशी चमक दाखवू शकलेला नाही. याउलट मेहदी हसन व संदीप लमिछनेने अष्टपैलू कामगिरी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली. त्यांचा नवोदित फलंदाज तौहीद हिरदोयकडून त्यांना चांगल्या अपेक्षा आहेत. मात्र, डेड रबर ठरलेल्या या सामन्यातून त्यांना फारसा लाभ होणार नसला तरीही आगामी विश्वकरंडक स्पर्धेसाठी अनुभव मात्र, निश्चितच मिळणार आहे.
तस्किन अहमद, शोरीफुल हसन ही त्यांची गोलंदाजांची दुकडी सरस कामगिरी करत असली तरीही त्यांना आवश्यक असे धावांचे पाठबळ मिळत नसल्याने त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. सुपर फोर गटात त्यांना पाकिस्तान व श्रीलंका या दोन्ही संघांकडून पराभव स्वीकारावा लागल्याने भारताविरुद्धच्या लढतीद्वारे थोडीफार प्रतिष्ठा जपण्याची संधी त्यांना आहे.
दुसरीकडे भारतीय संघ या लढतीत संघात काही बदल करण्याची तसेच प्रयोग करण्याची शक्यता आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता असून महंमद शमीला संधी देण्याचे संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर इशान किशनच्या जागी सूर्यकुमार यादवलाही संधी मिळू शकेल. पाठदुखीमुळे या स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना श्रेयस अय्यरला मुकावे लागणार असल्यामुळे तिलक वर्माला तर महंमद सिराजच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संघात संधी देण्यात येणार असल्याचेही वर्तवले जात आहे.
आगामी काळात भारतीय संघाला मायदेशातच ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची असून त्यानंतर लगेचच पुढील महिन्यापासून भारतातच एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. त्यामुळे भारतीय संघ सातत्याने प्रयोग करेल अशीच शक्यता व्यक्त होत आहे.
सूर्यकुमारवरच लक्ष…
टी-20 क्रिकेटमध्ये सरावलेला व मिस्टर 360 अशी ओळख बनलेला सूर्यकुमार याला या सामन्यासाठी संधी दिली जाणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे अद्याप एकदिवसीय सामन्यांत फारशी चमक दाखवण्यात अपयश आलेला सूर्यकुमार संधी मिळाली तर कशी कामगिरी करतो याकडे लक्ष राहणार आहे. आगामी काळात होत असलेल्या मालिकांपूर्वी मोठी खेळी करत एकदिवसीय संघातील आपले स्थान मजबूत करण्याचीही त्याला संधी आहे.