कॅंडी :- आशिया करंडक तसेच आगामी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा निर्णायक ठरेल, असे मत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केले आहे.
बुमराहने तब्बल 11 महिन्यांच्या कालावधीनंतर आयर्लंड विरुद्धच्या मालिकेत पुनरागमन केले व अत्यंत चमकदार कामगिरीही केली. त्याला पुन्हा एकदा आत्मविश्वास गवसल्याचे त्याच्या देहबोलीतून समोर येत आहे. त्याची वेगवान गोलंदाजी आशिया स्पर्धेत तसेच त्यानंतर होत असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत समोरच्या प्रत्येक संघासाठी आव्हान ठरणार आहे, असेही द्रविड म्हणाले.
दरम्यान, आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरुवात झाली असून ही स्पर्धा १७ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. भारताचा पहिला सामना उद्या(दि.२,शनिवार) पाकिस्तानशी श्रीलंकेत कँडी इथं होणार आहे. पहिल्या गटात पाकिस्तान, भारत आणि नेपाळ हे देश आहेत, तर दुसऱ्या गटात श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशाचा समावेश आहे.
विश्वकरंडक उद्घाटन 4 ऑक्टोबरला…
भारतात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 4 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा होणार आहे.