पाल्लेकेले :- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत आज पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यात साखळीतील लढत होत आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या या सामन्याकडे संपुर्ण क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताची सुरूवात खराब झाली. टीम इंडियाने अवघ्या 15 षटकातच 66 धावांवर चौथी विकेट गमावली होती.
चार विकेट पडल्यानंतर ईशान किशन आणि उपकर्णधार हार्दिक पांड्याने भारताचा ङाव सावरला आहे. इशान किशननंतर हार्दिक पांड्यानेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. हे त्याचे वनडेतील 11 वे अर्धशतक आहे.
हार्दिकने 34व्या षटकात आगा सलमानच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताने 34 षटकात 4 विकेट गमावत 178 धावा केल्या आहेत. इशान किशन नाबाद 72 आणि हार्दिक पंड्या 50 धावांवर नाबाद आहे.
दरम्यान, डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने रोहित शर्माला क्लीनबोल्ड करत भारताला पहिला धक्का दिला.रोहितने 22 चेंडूत 11 धावा केल्या. रोहित शर्मानंतर शाहीन आफ्रिदीनेही विराट कोहलीला बोल्ड केले. किंग कोहलीला केवळ चार धावा करता आल्या.भारताला 10व्या षटकात तिसरा धक्का बसला. श्रेयस अय्यर 9 चेंडूत 14 धावा करून झेलबाद झाला. हरिस रौफने अय्यरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर शुबमन गिल 32 चेंडूत 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. गिलला हारिस रौफने बोल्ड केले.