दुबई – पाकिस्तानविरुद्धच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतील सुपर फोर गटाच्या लढतीत भारतीय संघातून यष्टीरक्षक फलंदाज दीनेश कार्तिक याला वगळण्यात आले होते. त्यामुळे सध्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर सोशल मीडियावर टीका सुरू झाली आहे.
कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला का स्थान देण्यात आले, कार्तिकने यंदाच्या मोसमात सातत्यपूर्ण कामगिरी केली असूनही बेजबाबदार पंतला वारंवार संधी कशी देण्यात येते, असा सवाल तर समालोचकांनीही केला होता.
आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बेजबाबदार पद्धतीने फटका मारून पंत बाद झाला होता. याच पद्धतीने तो सातत्याने बाद होत आहे. मात्र, तरीही त्याला वारंवार संघात स्थान दिले जाते.
या उलट दिनेश कार्तिकने सरस कामगिरीत सातत्य राखूनही त्याचे संघातील स्थान कायम राहात नाही. बीसीसीआय, निवड समिती, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा पंतचे इतके लाड का करत आहेत, असा सवालही आता चाहत्यांनी विचारला आहे. तसेच चाहत्यांनी बीसीसीआय व निवड समिती यांच्यावरही ताशेरे ओढले आहेत.