Aditya Thackeray : राज्यातील सत्तांतरानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. त्यातच शिवसेना (ठाकरे गट )चे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका आहे. फडणवीसांवर टीका करताना आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि जिमचा काहीही संबंध नाही असे म्हणत त्यांना टोमणा मारला आहे.
लोणावळ्यात जिमचे उद्घाटन करण्यासाठी आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी तरुण आणि तरुणींना जिमचे महत्व पटवून दिले. तेव्हाच, त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. जिमला घेऊन राजकीय रंग नको द्यायला. आज जिमची तरुणांना गरज आहे. तरुण फिटनेसला घेऊन जागरूक आहेत. सायकलिंग, मॅरेथॉन, रनिंग तसेच जिमला तरुण प्राधान्य देत आहेत. ही काळाची गरज आहे. पुढे ते म्हणाले, जिम आणि देवेंद्र फडणवीस यांचा काही संबंध नाही. असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
पुढे आदित्य ठाकरे यांनी, उद्धव ठाकरे हे लवकरच शिवनेरीवर येणार आहेत. २०१८ साली जेव्हा राम मंदिराचा मुद्दा आम्ही उचलला आणि भाजपला याचा विसर पडला होता. आम्ही कायदा आणा, या मागणीवर ठाम होतो. योगायोग असा की शिवनेरी किल्ल्यावरून मूठभर माती आपण अयोध्येला नेली आणि त्यानंतर पुढच्या नोव्हेंबरमध्ये मंदिराचा निकाल लागला होता. ही भावना आमच्या मनात आहे. त्यामुळे अयोध्येला जाण्यापूर्वी पुन्हा एकदा शिवनेरी गडावर उद्धव ठाकरे नक्की जातील आणि तिथली मूठभर माती घेऊन अयोध्येला लवकरचं जाऊ, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले, मी पुन्हा एकदा तेच सांगेन. जो लाठीचार्ज झाला, त्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यातील जनरल डायर कोण? हे अद्याप जनतेला समजलेलं नाही. अधिकाऱ्यांची तर बदली झाली. पण, आदेश देणारे कोण? मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री? हे जनतेसमोर यायला हवं. प्रत्येक क्षेत्रात हे सरकार काहीच करताना दिसत नाही.” असा आरोप यावेळी त्यांनी केला.