दुबई – आशिया क्रिकेट समितीने अखेर आशिया करंडक स्पर्धेच्या हायब्रीड मॉडेलला मान्यता दिली आहे. यजमानपद जरी पाकिस्तानकडे कायम राखण्यात आले असले, तरीही तेथे केवळ चारच सामने होणार असून, संयुक्त यजमानपद दिल्या गेलेल्या श्रीलंकेत सर्वाधिक 9 सामने होणार आहेत. ही स्पर्धा येत्या 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.
यावेळी ही स्पर्धा दोन गटांत होणार असून, प्रत्येक गटातील 2 संघ सुपर-4 टप्प्यात पोहोचतील. सुपर-4 फेरीतील अव्वल 2 संघ अंतिम फेरीत खेळतील. यावेळी आशिया करंडक स्पर्धा एकदिवसीय सामन्यांची खेळवली जाणार असून, भारतात आगामी काळात होत असलेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने सर्व संघांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळचे संघही खेळणार आहेत.
पाकिस्तानकडे या स्पर्धेचे यजमान होते, पण बीसीसीआयने सुरक्षेच्या कारणाने भारतीय संघाला तेथे पाठवण्यास नकार दिल्याने ही स्पर्धाच संकटात आली होती. त्यातच बांगलादेश व श्रीलंका संघांनीही भारताच्या भूमिकेला दुजोरा दिला. त्यावेळी पाकिस्तान क्रिकेट मंडळानेही हटवादी भूमिका घेत ही स्पर्धा पाकिस्तानातच आयोजित करण्याचा आग्रह धरला. अखेर बीसीसीआय आणि इतर क्रिकेट मंडळांच्या दबावापुढे पाक मंडळाला नमते घ्यावे लागले.
अंतिम लढत श्रीलंकेतच
आता स्पर्धेचे यजमानपद जरी पाकिस्तानकडे अससले तरीही त्यापेक्षा दुप्पट सामने श्रीलंकेत होणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामनाही श्रीलंकेत होणार आहे. त्यामुळे पाकिस्तान मंडळाचे मोठे नुकसानही होणार आहे.