नेवासा (प्रतिनिधी) :- नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील बौद्ध समाजातील अक्षय भालेराव या युवकाने भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याच्या कारणावरुन तेथील गावच्या गावगुंडांकडून भालेराव याची निर्घृण हत्या करण्यात आली.या प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरुन गेलेला असून दोषींवर कडक कारवाई करुन मृतक अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी व भालेराव कुटूंबियाला पोलीस संरक्षण देेवून ज्या गावगुंडाकडून अक्षयची निर्घण हत्या करण्यात आली त्या जातीयवादी समाजकंटकांची मालमत्ता सरकार जमा करण्यात यावी अशी मागणी नेवासा तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने नेवासा तहसिलदार आणि पोलीस निरिक्षकांना निवेदन देऊन करण्यात आली.
तसेच या घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने गुरुवार (दि.२२) रोजी नेवासा तहसिल कार्यालयावर भव्य जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व नेवासा तालुकाध्यक्ष सुशिल धायजे यांनी निवेदनाव्दारे दिली.
यावेळी भिमसैनिकांच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माणुसकीला काळीमा फासणारी घटना नांदेड जिल्ह्यात घडल्यामुळे क्रुरतेच्या सिमापार झालेल्या असून दलीत अत्याचार वाढलेले असल्याच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेद्ध करण्यात आला व अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने तात्काळ ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी करुन कुटुंबातील एका सदस्याला शासकिय सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्यात मागणी करण्यात आली तसेच भालेराव कुटुंबियांना शस्त्रधारी सुरक्षा प्रदान करण्यात यावी व हत्या प्रकरण जलदगती न्यायालयाकडे सुपूर्द करुन प्रकरण तातडीने निकाली काढण्यात यावे व या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, इत्यादी मागण्यांसाठी नेवासा तहसिलदार व पोलीस निरिक्षकांना रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या नेत्तृत्वाखाली निवेदन देवून या घटनेचा जाहिर निषेद्ध करण्यात आला.
यावेळी पप्पूभाई इंगळे,प्रशांत बनसोडे,नितीन भालेराव,राजू इंगळे,बाळासाहेब ठोंबरे, अॅड सुदाम ठुबे,पोलीस पाटील आदेश साठे,रंजन जाधव,सचिन गायकवाड,संजय बनसोडे यांच्यासह मोठ्या संख्येने भिमसैनिक यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना रिपाईचे जिल्हाध्यक्ष थोरात म्हणाले की, नांदेडमधील अक्षय भालेराव या युवकाच्या निघृण हत्येची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेलेली आहे. आंबेडकर इंटरनॅशनल मिशननं या हत्या प्रकरणाची दखल घेत भूमिका मांडली आहे. आंबेडकरी आणि बौद्ध समुदयावरील जातीयवादी हल्ले या प्रकरणामुळे पुन्हा अधोरेखित झाल्याचे मिशनने म्हटले आहे तरी राज्य शासनाने भालेराव कुटूंबियांना शस्रधारी पोलीस संरक्षण देवून ५० लाख रुपयांची मदत तातडीने देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली.